नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने गुऊवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवत लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने राणा यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा निकाल दिला. अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत बहुचर्चित असलेला निकाल गुऊवारी आला. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली. नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी 2011 मध्ये विवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.
आनंदराव अडसूळ यांच्याकडून आव्हान
2013 मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना ‘मोची’ जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडळताडणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्याविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडळताडणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्या ‘मोची’ नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. जून 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्या निर्णयास आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
...विरोधकांना उत्तर मिळाले : नवनीत राणा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नवनीत राणा यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘माझ्या जन्मावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आज उत्तर मिळाले आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. सत्याचा नेहमीच विजय होतो. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांचा हा विजय आहे,’ असे राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.