रालोप, आसप, जजपमुळे राष्ट्रीय पक्षांना धास्ती
राजस्थानात जननायक जनता पक्ष (जजप), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (रालोप) आणि आझाद समाज पक्ष (आसप) यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या समीकरणांना बिघडविणार असल्याची चर्चा आहे. हनुमान बेनीवाल यांचा रालोप आणि चंद्रशेखर आझाद यांचा आसप यांच्यात झालेल्या आघाडीने दोन्ही प्रमुख पक्षांची चिंता वाढली आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होती. तेव्हा काँग्रेसला 39.8 टक्के मते आणि 99 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 39.3 टक्के मते आणि 73 जागा मिळाल्या होत्या. 2018 मध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर हनुमान बेनीवाल यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. बेनीवाल यांच्या नव्या पक्षाला तेव्हा 2.3 टक्के मतांसह 3 जागा जिंकण्यास यश मिळाले होते.
राजस्थानातील 200 जागांपैकी 20 जागांवरील विजय-पराभवातील अंतर 1-5 हजार मतांदरम्यान राहिले होते. तर 9 जागांवर मतांचे अंतर 1 हजारपेक्षाही कमी होते. यातील 12 मतदारसंघांमध्ये बेनीवाल यांच्या पक्षाला लक्षणीय मते मिळाली होती. बेनीवाल यांचा पक्ष नसता तर मागील निवडणुकीत चित्र वेगळे दिसून आले असते असे मानले जाते. यावेळी बेनीवाल यांनी चंद्रशेखर यांच्या आसपसोबत आघाडी करत 100 हून अधिक मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. यातील 60 मतदारसंघांमध्sय जाट-दलित समीकरण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. तर जजपने हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या भागांमधील 24 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. रालोप आणि आसप आघाडीसोबत जजपच्या एंट्रीमुळे जाट मतपेढीसाठीची लढाई बहुरंगी ठरली आहे.
तिन्ही पक्षांचेप्रमुख प्रभावक्षेत्र
हनुमान बेनीवाल यांच्या रालोपचा जाटलँडमध्ये मोठा प्रभाव आहे. नागौर, सीकर, झुंझुनू, भरतपूर समवेत सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये जाट मतदारांचे बाहुल्य आहे. बेनीवाल हे नागौरचे खासदार आहेत. तर आता खींवसर येथून निवडणूक लढवत आहेत. जजपचीही नजर जाटलँडवरच आहे. जाटलँडमध्ये दोन्ही जाटधार्जिण्या पक्षांदरम्यान चुरस दिसून येत आहे. तर दलिबहुल मारवाड भागातील जागांवर आसपची नजर आहे.