महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाथमहाराज ह्या स्कंधाला तुळशी वृंदावनाची उपमा देतात

06:56 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले,  हा भागवताचा एकादश स्कंध म्हणजे भगवंतांनी उद्धवाला सांगितलेली गीता असल्याने ह्यातील उद्धवाला उपदेश करणाऱ्या श्रीकृष्णाच्या रुपात त्याच्या अनेक अवतारांच्या रूपांची आठवण होते. उदाहरणार्थ उद्धवाच्या उद्धारासाठी तत्पर असलेल्या श्रीकृष्णामध्ये गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी अत्यंत वेगाने धावलेल्या श्रीहरिच्या रुपाचा भास होतो किंवा अत्यंत अभिमानी असलेल्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी खांबात नृसिहरूपाने प्रकटलेल्या भक्तकैवारी कृपापूर्ण श्रीविष्णूचे रूपही ह्यातील श्रीकृष्णात दिसते. ह्या एकादश स्कंधात कृष्ण आणि उद्धव ह्यांच्यात झालेला हृदयंगम संवाद म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असेही म्हणता येईल आणि ह्यातील ज्ञानाचा ओघ म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती ह्यांच्या त्रिवेणी संगमात गुप्त असलेली सरस्वती होय. जे ह्याचा मनापासून अभ्यास करतील त्यांना वैराग्यप्राप्ती होऊन त्यांना श्रद्धेच्या अरुणोदयात नित्य स्नान घडेल. त्यामुळे त्यांना संपूर्ण कृष्णपदवी प्राप्त होईल. असं म्हंटलं तरीही चुकीचं होणार नाही की, ह्या श्रीकृष्ण आणि उद्धवाच्या अंतरमनातल्या गुप्त गोष्टी असून त्या वाचायला, ऐकायला मिळणे हा क्वचित कधीतरी येणारा कपिलाषष्ठीचा अत्यंत पवित्र योग होय. जे साधक ह्या पर्वकाळात निमग्न होईल त्यांचे तत्काळ कल्याण होईल. त्यांना जन्ममरण हे देहाशी संबंधित असून ते आत्मस्वरूप असल्याने त्यांना त्यांची काहीही बाधा नाही हे लक्षात आल्याने ते जन्ममरणाच्या भीतीतून मुक्त होतील आणि जे जन्ममरणाच्या भीतीतून मुक्त होतात ते स्वत: परिपूर्ण ब्रह्म होतात. नाथमहाराज ह्या स्कंधाला तुळशी वृंदावनाची उपमा देताना म्हणतात, हा एकादश स्कंध नसून हे एकतीस खणांचे वृंदावन आहे आणि त्यात त्यांची स्वानंदपूर्ण निजसत्ता कार्यरत आहे. ह्या स्कंधाचे पंधराशे श्लोक म्हणजे त्या तुळशी वृंदावनातील तुळशीच्या रोपाची पाने असून त्याला असलेले ज्ञानमंजरीचे घोस अतिसुरेख आहेत. ते अगदी शोभून दिसत आहेत. ह्या स्कंधाच्या वाचनाने आणि श्रवणाने काय काय लाभ पदरी पडतील त्याबद्दल ते आता सांगत आहेत. ते म्हणाले, ह्या ग्रंथाच्या श्रवणवाचनात जे नीजजीवन घालवतील ते परम पावन होऊन परिपूर्ण ब्रह्म असलेल्या स्वानंदाच्या कृष्णसदनी दाखल होतील. जे वृंदावनातील तुळशीच्या मुळाना घातलेल्या पाण्याला वंदन करतील आणि कपाळाला त्यातली माती लावून घेतील तेही तिन्ही लोकांना वंद्य होतील कारण त्यांनी निजसखा असलेल्या श्रीकृष्णाशी सख्यत्व जोडल्यासारखेच होते. जे ह्या तुळशी वृन्दावनाला सद्भावनेने पठणरुपी प्रदक्षिणा घालतील त्यांनी श्रीकृष्णाच्या पायांना मिठी घातल्यावर जे पुण्य पदरात पडते ते मिळवल्यासारखे होईल. ह्या कथेत सांगितलेल्या श्रीकृष्णाच्या विचित्र लीला नित्य आठवतील त्यांच्याजवळ श्रीकृष्ण नित्य वास करत असल्याने ते कलीकाळाला सहज हरवतील. ह्या एकादश स्कंधाच्या वृंदावनाचे जे श्रवण करून नित्य पूजन करतील त्यावर प्रसन्न होऊन त्यांचा देहाभिमान श्रीकृष्ण निर्दाळून टाकेल. देहाभिमान घालवणे ही सहज साधणारी गोष्ट नाही पण श्रीकृष्णाची कृपा झाल्यावर अशक्य ते काय? ह्या अध्यायातील प्रसंगावर मनन करून जो त्या मननाची ओंजळ फुलाच्या ओंजळीप्रमाणे तिन्ही त्रिकाळ श्रीकृष्णाच्या पायावर वाहतील त्यांनाही हरीच्याजवळ राहण्याचे भाग्य लाभेल. ह्या श्रीमदभागवताच्या वृन्दावनाचा सखोल अभ्यास करून संतसज्जनांना जमवून त्यावर जे व्याख्यान देतील त्यांनी श्रीकृष्णाची निरपेक्षतेने महापूजा केल्यासारखे होईल. ह्या महापूजेने श्रीजनार्दनाला संतोष वाटेल. जे व्याख्यान देतील आणि ते जे सावधान राहून ऐकतील त्यांना श्रीकृष्ण निजात्मज्ञान स्वत: देतील.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article