काँग्रेसमुळेच रखडले ‘नारीशक्ती अधिनियम’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका
पणजी : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, रविवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. पणजी येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा श्रीमती सुवर्णा प्रभू तेंडुलकर, सरचिटणीस श्रीमती विद्या गावडे व श्रीमती उषा नागवेकर, सचिव श्रीमती आरती बांदोडकर उपस्थित होत्या.
महिलांना कायदेशीर अधिकार देणारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे ऐतिहासिक विधेयक काँग्रेसच्या अडवणुकीच्या धोरणामुळे आणि असहकार्यामुळे लोकसभेत पास होऊ शकले नाही. काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर केवळ राजकारण केले असून त्यांना प्रत्यक्षात महिलांना अधिकार द्यायचे नाहीत. हे विधेयक रोखणे म्हणजे देशातील कोट्यावधी नारीशक्तीचा अपमान आहे. दशकांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला, मात्र विरोधकांनी त्यात खोडा घातल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचे स्वप्न पाहिले आहे, पण काँग्रेसच्या नकारात्मक भूमिकेमुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाची ही जुनी सवय आहे. कारण भाजपद्वारे ज्या ज्या वेळी देशहिताचे जे निर्णय घेण्यात आले त्या त्या वेळी काँग्रेसने विरोधी भूमिका घेत देशाचे नुकसान केले आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.