Ratnagiri News : अवकाळीने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दाणादाण
नाणज येथे अर्धवट कामांचा ग्रामस्थांना फटका; पावसाचे पाणी थेट घरे, दुकानांसह अंगणात घुसले
रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम तालुक्यातील नाणिज परिसरात ग्रामस्थांच्या मुळावर उठले आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने या महामार्गावरील बेजबाबदारपणाच्या कामाचे जणू वाभाडे काढले. अर्धवट राहिलेल्या 'आऊटलेट'च्या कामांमुळे पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात, दुकानांत आणि अंगणात घुसले. अवकाळीतच ही दुरवस्था असेल, तर भीषण मान्सूनमध्ये आमचे काय होणार? असा संतप्त सवाल नाणिजवासीयांनी उपस्थित केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाणीज पंचक्रोशीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरून वाहणारे पाणी थेट सर्व्हिस रोडवर आले आणि तिथून ते शेजारील वस्त्यांमध्ये शिरले. गटारांची कामे अर्धवट असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. परिणामी, दुकानांमधील मालाचे आणि घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली.
वर्ष सरले तरी काम रखडलेलेच ! गतवर्षीही पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वर्षभर वेळ असतानाही ठेकेदार कंपनीने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी चिराग खटकूळ यांनी केला आहे. मान्सून तोंडावर आला असतानाही गटारांची कामे पूर्ण न होणे, हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे खटकूळ यांनी म्हटले आहे.
'मान्सून पूर्वी मार्ग काढा, अन्यथा...
मान्सूनला आता केवळ १५ ते २० दिवस शिल्लक आहेत. अवकाळी पावसाने दिलेला हा इशारा प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास नाणिज परिसरातील शेकडो कुटुंबांना पावसाळ्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तातडीने आऊटलेट आणि गटारांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी खटकूळ आणि ग्रामस्थांनी केली आहे.