‘नंदी’ने तोडले बॅरिकेड, कृष्ण थोडाच स्वस्थ बसणार ?
वृत्तसंस्था / लखनौ
रामजन्मभूमीनंतर आता शिवभूमी आणि कृष्णजन्मभूमीही मुक्त होईल, असा संकेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. ते उत्तर प्रदेश विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना भाषण करीत होते. वाराणसीतील व्यासजी तळघरात हिंदूंना पूजापाठ करण्याचा अधिकार तेथील जिल्हा न्यायालयाने नुकताच दिला आहे. हे तळघर वाराणसीतील ज्ञानवापीच्या परिसरातील नंदीच्या समोरच आहे. त्याला उद्देशून आदित्यनाथ यांनी ही टिप्पणी केली.
न्यायालयाच्या आदेशावरुन या तळघराचे बॅरिकेडस् तोडण्यात आले असून आता तळघरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तळघरात जाताना समोरच्या नंदीचे दर्शन घेऊनच जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे नंदीच्या कृपेमुळेच हे बॅरिकेडस् तोडले गेले अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिचा उल्लेख आदित्यनाथ यांनी केला.
शिवभूमी मुक्त होणार
वाराणसीची शिवभूमी लवकरच मुक्त होईल अशी भाविकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आता मथुरेत ‘बंदीवासात’ असणारे भगवान श्रीकृष्णही मुक्त होतील, अशी शक्यताही निर्माण झाली आहे. कृष्णजन्मभूमीवर पूर्वी पुरातन हिंदू मंदीर होते. ते फोडून औरंगजेबाने त्याच स्थानी मशीद उभारली होती, असा नि:संदिग्ध निर्वाळा नुकताच भारतीय पुरातत्व विभागाने दिला आहे. ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमीसंबंधीची प्रकरणे सध्या न्यायालयांमध्ये विविध स्तरांवर हाताळली जात आहेत. महाभारत काळातील लाक्षागृहाचे स्थानही हिंदूंचेच आहे, असा स्पष्ट निर्णय उत्तर प्रदेशातील बागपत येथील कनिष्ठ न्यायालयाने नुकताच दिला आहे.