नायडू यांचा रेड्डी यांना खोचक प्रश्न
तिरुपती लाडू वादाला वेगळे वळण लागणे शक्य
वृत्तसंस्था / विजयवाडा
‘भगवान व्यंकटेश्वरावर माझा विश्वास आहे, अशा घोषणापत्रावर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्वाक्षरी केली होती का ? असा खोचक प्रश्न आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी विचारला आहे. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना त्यांनी भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात प्रवेश केला होता. तथापि, मंदिराच्या नियमानुसार कोणत्याही हिंदू नसलेल्या भक्ताला अशा घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी लागते. याच नियमाचा आधार घेऊन नायडू यांनी हा मंगळवारी उपस्थित केलेला आहे.
भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन कोणताही भक्त घेऊ शकतो. कोणावरही यासंदर्भात बंदी नाही. तथापि, भक्त जर हिंदू धर्माचा नसेल तर त्याला ‘माझा भगवान व्यंकटेश्वरावर विश्वास आहे’ असे घोषित करुन घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी लागते. ही या देवस्थानाची परंपरा आहे. रेड्डी यांनी ही परंपरा पाळली आहे काय ? त्यांचा भगवान व्यंकटेश्वरावर विश्वास नसेल तर त्यांनी मंदिरात जावेच का ? असेही प्रश्न चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना विचारले.
जनादेश कशासाठी आहे...
मला आंध्र प्रदेशच्या जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हाती घेण्याचा जनादेश दिला आहे. पण हा जनादेश परंपरांचे भंजन करण्यासाठी किंवा परंपरांचा अवमान करण्यासाठी दिलेला नाही. काही लोक भक्तांच्या भावना दुखाविण्याच्या हेतूने भगवान हनुमान, भगवान श्रीराम इत्यादी देवतांच्या मूर्तींचा पावित्र्यभंग करतात. काहीवेळा मंदिरांच्या रथांना आग लावली जाते. खरे तर, कोणीही कोणाच्याही धार्मिक भावनांचा अनादर करु नये. असे करणाऱ्याचे देव बघून घेतो. धर्म कोणताही असो, त्याने अन्य धर्माचा अपमान करु नये. भगवान व्यंकटेश्वराच्या संदर्भात जर कोणी असे वागले असेल, तर तो या देवतेचा द्रोह आहे. असत्याचे रुपांतर सत्यात करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असेही आवाहन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या ‘एक्स’ संदेशात केलेले आहे.
सुब्बारेड्डी यांची पार्श्वभूमी
तिरुमला तिरुपती देवस्थानाचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारे•ाr यांनी 2020 मध्ये एक विधान केले होते. कोणत्याही बिगर हिंदूला भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नाही, असे ते विधान होते. मात्र, या विधानामुळे भाविकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली होती. अनेक हिंदू संघटनांनी आंदोलने केली होती. त्यामुळे सुब्बारेड्डी यांना त्यांचे विधान मागे घ्यावे लागले होते. नायडू यांच्या विधानाला या घटनेची पार्श्वभूमी आहे.
अनेकांनी घेतले आहे दर्शन
हिंदू नसलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी अशा घोषणापत्रावर स्वाक्षरी न करता भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन आजवर घेतलेले आहे. जगनमोहन रेड्डी यांनीही अशाच प्रकारे दर्शन घेतले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नायडू यांच्या या विधानामुळे तिरुपती लाडू प्रसाद भेसळ प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता काही तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
नियम काय सांगतो ?
तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या नियम 136 अनुसार भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन केवळ हिंदूधर्मियांनाच घेता येते. हिंदू नसलेल्या भाविकांना जर दर्शन घ्यायचे असेल, तर त्यांना आधी तशी माहिती देवस्थानाच्या व्यवस्थापनाला द्यावी लागते आणि स्वत:चा धर्म कोणता आहे, हे स्पष्ट करावे लागते. नियम 137 अनुसार हिंदू नसलेल्या भाविकांना विश्वास घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी लागते. 2014 मधील एका पत्रकानुसार हिंदू नसलेल्याने भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले तर देवस्थानच्या व्यवस्थापनाला त्याच्याकडून असे विश्वास घोषणापत्र मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोणताही हिंदू नसलेला नागरीक भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन अशा घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्याशिवाय घेऊच शकत नाही. तथापि, व्यवहारी सोय म्हणून भूतकाळात काहीवेळा या नियमाला बगल दिली गेल्याचे दिसून येते.