ना. मकरंद पाटील यांचे तत्पर आदेश; नुकसानग्रस्त मेंढपाळाला दिलासा ; २४ तासांत खात्यावर ६४ हजार जमा
वाई तालुक्यातील मेंढपाळाला तातडीची आर्थिक मदत
सातारा - सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत असताना, नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्याची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे.वाई तालुक्यातील आसले गावात विज पडून मेंढ्यांचा मृत्यू झाल्यानंतर, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तातडीने मदत देण्याचे आदेश दिले.
वाई तालुक्यातील आसले गावच्या शिवारात विज कोसळून १६ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच मंत्री मकरंद पाटील यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाने जलद हालचाली करत पंचनामा पूर्ण केला आणि शासनाच्या नियमांनुसार प्रत्येकी ४ हजार रुपये याप्रमाणे एकूण ६४ हजार रुपयांची आर्थिक मदत नुकसानग्रस्त मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या बँक खात्यात अवघ्या २४ तासांच्या आत जमा करण्यात आली.
या जलद कार्यवाहीमुळे नुकसानग्रस्त मेंढपाळाला मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटात, शेतकरी आणि पशुपालकांच्या मदतीसाठी शासन तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.