येळ्ळूर साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ
येळळूर : 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उद्योजक आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती यांच्या हस्ते शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवारी रोवण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते. प्रमुख वक्ते म्हणून युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक अभिजीत सायमोते यांनी, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढीला लागते. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. उद्योजक आर. एम. चौगुले म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे काम येळ्ळूर गाव साहित्य संमेलनाच्या निमित्ताने करीत आहे, ही खरोखरच सीमावासियांना अभिमानास्पद बाब आहे. यावेळी लक्ष्मी मासेकर, रावजी पाटील, शिवाजी सायनेकर, ग्रा.पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, मुख्याध्यापक अरुण धामणेकर, मुख्याध्यापक मोहन पाटील, डॉ. तानाजी पावले, संजय मजूकर, डॉ. सरिता गुरव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, आभार मुख्याध्यापक बाचीकर यांनी मानले.