धोकादायक झाडे हटविण्याबाबत मनपाचा वन खात्याला प्रस्ताव
शहरामध्ये सुमारे 150 झाडे धोकादायक
बेळगाव : शहरामध्ये पाऊस, तसेच वाऱ्याने झाडे कोसळून जीवितहानी व वित्तहानी होत असते. त्यामुळे धोकादायक झाडांचा सर्व्हे केला जातो. शहरामध्ये सुमारे 150 झाडे धोकादायक असून ती हटवावीत, असा प्रस्ताव महानगरपालिकेकडून वनविभागाला पाठवून देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्या धोकादायक झाडांबाबत वनविभागाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये झाडे कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. तसेच मालमत्ता, वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी वारंवार होत असते. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने याबाबत सर्व्हे करून वनविभागाकडे पाठविला आहे, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.धोकादायक झाडे हटविल्यानंतर खुल्या जागेमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. किल्ला तलाव येथील अशोक सर्कलपासून गांधीनगर ओव्हरब्रिज,तसेच कणबर्गी रोडवरील सर्कलपर्यंत असलेल्या दुभाजकांवर विविध प्रकारची फुलांची रोपटी लावण्यात आली आहेत. यापुढेही इतर ठिकाणी जास्तीतजास्त फुलांचे रोप व शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. झाडे हटविली तरी प्रदूषण रोखण्यासाठी वनस्पतीदेखील लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली आहे.