शहापूर, खासबाग येथील समस्यांची मनपाकडून पाहणी
तातडीने गटारींची सफाई करण्याची अधिकाऱ्यांना सूचना, बसवेश्वर सर्कल नाल्यावर घालणार जाळी
बेळगाव : कोनवाळ गल्ली नाला आणि महात्मा फुले रोडवरील गटारींची पाहणी केल्यानंतर बुधवारी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व मनपा अधिकाऱ्यांनी बसवेश्वर सर्कल येथील नाला आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारीच्या समस्येची पाहणी केली. गटार ठिकठिकाणी तुंबली असल्याने तातडीने स्वच्छतेचे काम सुरू करण्यात यावे, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नाला आणि गटारींच्या समस्या मांडल्या होत्या. अनेकवेळा तक्रार करून देखील अधिकाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची सफाई करण्यात यावी. पावसाचे पाणी वाहून जाण्यास केरकचऱ्यामुळे अडथळे निर्माण होत असल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहरातील कच्च्या व पक्क्या नाल्यांची सफाई करण्याबरोबरच तातडीने गटारींचीदेखील सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
विशेषकरून बैठकीत कोनवाळ गल्लीतील नाला आणि बसवेश्वर सर्कल येथील नाल्याचा प्रश्न चर्चेत आला होता. कोनवाळ गल्लीतील नाला धोकादायक बनला असल्याने तातडीने नाल्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला मनपा अधिकारी जबाबदार राहतील, असा आरोप करण्यात आला होता. तसेच महात्मा फुले रोडवरील गटारीवर काँक्रिट घालण्यात आले असल्याने ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत, असे सांगितल्यानंतर दोन दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर व मनपा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्यासंदर्भात सूचना केली आहे.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी देखील आपल्या प्रभागात येणाऱ्या बसवेश्वर सर्कल येथील नाला आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार बुधवारी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी स्वत: भेट देऊन नाला व गटारींची पाहणी केली. बसवेश्वर सर्कल येथील नाल्यावर जाळी बसविण्याची सूचना अधिकाऱ्यांना महापौरांनी केली. महात्मा फुले रोड आणि नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या गटारींचा प्रश्न एकच स्वरुपाचा असल्याने वेगळ्या पद्धतीने गटारींची सफाई केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर सदर सफाई कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी गेल्या दोन वर्षांपासून याकामी मनपाकडे पाठपुरावा चालविला होता. त्याला यश आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.