मुंबईची हाराकिरी
राजस्थान रॉयल्सच्या सुरवातीच्या आणि मोलाच्या फलंदाजाना झटपट बाद करून सामन्यवर मिळविलेली पकड मुंबई संघाला शेवट पर्यंत टिकविता आली नाही. परिणामी त्यांना दहाव्या पराभवास सामोरे जावे लागले. आणि राजस्थान संघाने प्ले ऑफ मध्ये निर्धाराने प्रवेश केला. स्पर्धेतील 14 पैकी 10 वी हार ही मुंबईच्या गचाळ कामगिरीची शोकांतिका ठरली. वानखेडे स्टेडीयमवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय योग्य ठरला. कारण वैभव सूर्यवंशी (4) जैस्वाल (27) रियान पराग (14) यांना स्वस्तात बाद करण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले, 3 बाद 54 नंतर मुंबईची सामान्यवरील पकड सैल झाली. राजस्थानच्या एकाही फलंदाजाने अर्धशतक देखील झळकावले नाही. परंतू त्यांनी उपयुक्त भागीदाऱ्या केल्या. जुरेल (38) शनाका (29) आर्चर (32) जडेजा (19) यांनी संघास 200 चा टप्पा पार करून दिला.
दुसऱ्या डावात, प्रकाशझोतात 205 धावांचे लक्ष मुंबईसाठी सोपे आव्हान नव्हते. जिद्द असली की काय साध्य करता येते हे राजस्थानने दाखवून दिले. मुबंईची सलामीची जोडी तसेच महत्वाच्या फलंदाजाना पद्धतशीरपणे तंबूत पाठवून राजस्थानने आपला विजयाचा मार्ग सोपा केला असे म्हणावे लागेल.
रोहित शर्मा (0) रिकेल्टन (12) नमन धीर (6) तिलक वर्मा (6) असे फलंदाज बाद होऊन निराश होऊन तंबूत परतले व इथेच राजस्थानचा विजयाचा दरवाजा खुला झाला.कर्णधार सूर्या चमकला पण तो पर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सूर्या (60) बिल जॅक्स (33) पांड्या (34) यांची उपयुक्त खेळी संघांसाठी पुरेशी आणी तारक ठरली नाही.अर्थात राजस्थानच्या जोफ्रा आर्चरला मोठे श्रेय द्यावे लागेल. त्याने खेळपट्टी अचूक ओळखून योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करून त्याने मुंबईचे महत्वाचे फलंदाज टिपले. आर्चरचे, 4 षटके 17 धावा आणी 3 बळी, हे गोलंदाजीचे पृथ्थ:करण पुरेसे बोलके आहे.मुंबई कडून मोठ्या भागीदाऱ्या झाल्या नाहीत हेच त्यांच्या अपयशाचे कारण ठरले.राजस्थानने निर्धारपूर्वक आणि सामूहिक खेळाचा आदर्श नमुना पेश केला यात शंका नाही.राजस्थान आता प्ले ऑफमध्ये न्यू चंदीगड येथे 27 मे रोजी हैदराबाद संघाशी दोन हात करेल.