मुंबईला बोनस गुणासह विजयाची गरज
मेघालयविरुद्ध आजपासून महत्त्वाची रणजी लढत
वृत्तसंस्था/ मुंबई
विद्यमान विजेता मुंबई व मेघालय यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील महत्त्वाचा सामना आज गुरुवारपासून येथे सुरू होत असून मुंबईला हा सामना बोनस गुणांसह मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. या स्थितीमुळे संघावर मोठे दडपण असणार आहे.
इलाईट अ गटातील मुंबईचा हा शेवटचा सामना आहे. मुंबईला गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मिर संघाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्याने जेतेपद राखण्याच्या त्यांच्या मोहिमेलाही धक्का बसला. विशेष म्हणजे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर व कर्णधार अजिंक्य रहाणे यासारखे अव्वल फलंदाज संघात असूनही मुंबईला हार पत्करावी लागली होती. फक्त शार्दुल ठाकुरने एकाकी लढत देत 51 व 119 धावा जमवित मुंबईला लढण्याची संधी दिली. पण त्याचे प्रयत्नही अपुरे पडले. फलंदाजीस अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवरही मुंबईचे दिग्गज फलंदाजी पूर्ण अपयशी ठरले.
मेघालयविरुद्धच्या सामन्यात रोहित, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर यांच्याशिवाय खेळणार आहे. त्यामुळे मुंबईला आयुष म्हात्रे, सूर्यांश शेडगे, अंगकृशा रघुवंशी यासारख्या युवा खेळाडूंकडूनच अपेक्षा करावी लागणार आहे. 17 वर्षीय म्हात्रेने या मोसमात सहा प्रथमश्रेणी सामन्यात दोन शतके झळकवली असून त्याने 5 रणजी सामन्यात 45.33 च्या सरासरीने दोन शतके व एका अर्धशतकासह 408 धावा जमविल्या आहेत. सिद्धेश लाडलाही या संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे. चार सामन्यांत त्याने 74.60 च्या सरासरीने 373 धावा जमविताना एक शतक, दोन अर्धशतके नोंदवली आहेत.
मुंबईने सहा सामन्यात 3 विजय, 2 पराभव व एक अनिर्णीत सामन्यांतून 22 गुण मिळविले आहेत. तितक्याच सामन्यात जम्मू-काश्मिरने 4 विजय, 2 अनिर्णीत सामन्यांतून 29 गुण मर बडोदाने 4 विजय, 1 पराभव व 1 अनिर्णीय सामन्यांतून 27 गुण मिळविले आहेत. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या मुंबईला मेघालयवर बोनस गुणांसह मोठा विजय मिळवावा लागेल आणि त्याचवेळी बडोदा संघ जेके संघावर विजय मिळविण्याची अपेक्षा करावी लागेल. बडोदाने विजय मिळविल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. बडोदाने पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केले होते. मुंबईला मात्र आगेकूच करण्यासाठी 3 गुण मिळविण्याची गरज आहे.