मुंबई महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही !
तामिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानाने ठाकरे गटाचा हल्लाबोल
प्रतिनिधी, मुंबई :
महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई, मराठी, मराठी महापौर हे विषय संवेदनशील झाले असतानाच भाजपचे स्टार प्रचारक तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईला बॉम्बे असे संबोधले आहे. शइवाय मुंबई शहर महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असल्याचे विधान केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप नेत्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून, त्यावरून उद्धव ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मुंबईतील निवडणुकीसाठी भाजपकडून देशातील विविध राज्यांतील नेत्यांना प्रचारात उतरवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईतील एका प्रचार दौऱ्यात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुंबईला बॉम्बे असे संबोधत हे शहर महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असल्याचे विधान केले. अण्णामलाई या मुलाखतीत म्हणतात की, इथल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे. जर तुम्ही चेन्नई पाहिले तिथे डिएमके आहे आणि टॉपला भाजपा, बंगळुरू काँग्रेस, भाजपा आणि हैदराबाद येथेही काँग्रेस भाजपा असे आहे. मात्र देशातील एकमेव असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. पेंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजप महापौर असेल.
कारण बॉम्बे महाराष्ट्रातले शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट 75 हजार कोटी आहे. ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट 8 हजार कोटी आहे. बंगळुरू 19 हजार कोटी आहे. त्यामुळे पेंद्र, राज्य आणि महापालिका अशा तिन्ही स्तरांवर एकाच पक्षाचे सरकार असणे गरजेचे असल्याचा मुद्दा मांडत आर्थिक नियोजन आणि प्रशासनावर भर दिला.
मुंबई शब्द नसून त्यामागे संघर्ष आहे : ठाकरे
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे गटाने याला जोरदार विरोध केला आहे. उद्धवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी अण्णामलाई यांच्या विधानावर तीव्र शब्दांत टीका केली. मुंबईचे नाव आणि ओळख ही केवळ शब्दांची बाब नसून, त्यामागे मराठी माणसाचा संघर्ष, बलिदान आणि स्वाभिमान दडलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला बॉम्बे म्हणणे आणि ती महाराष्ट्राची नाही असे सूचित करणे हे मराठी माणसाच्या अस्मितेला आव्हान देणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या काळात मुद्दामहून अशा विधानांद्वारे मराठी समाजाला चिथावण्याचा प्रयत्न करू नये. मुंबई म्हणजे मुंबईच आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे, हे कुणीही विसरू नये, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. अशा वक्तव्यांमुळे निवडणुकीच्या प्रचारात मराठी विऊद्ध अमराठी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.