मुंबई इंडियन्सला विजयाची गरज
वृत्तसंस्था/ बडोदा
महिलांच्या प्रीमीयर लीग टी-20 स्पर्धेत सोमवारी येथे होणाऱ्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी विजयासाठी झगडावे लागेल. मात्र या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सलग 5 सामने जिंकल्यानंतर आरसीबी संघाला शनिवारच्या सामन्यात पहिल्या पराभवला सामोरे जावे लागले होते. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना पराभूत करुन गुणतक्त्यात 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
आरसीबीचा संघ पुन्हा सोमवारच्या सामन्यात विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करेल. दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने यापूर्वी सलग 3 सामने गमाविल्याने त्यांना प्ले ऑफ गटातील प्रवेशासाठी अधिक झगडावे लागत आहे. सोमवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला केवळ विजय मिळविणे पुरेसा नाही पण या संघातील खेळाडुंना सूर मिळणे गरजेचे आहे. मुंबई संघातील नॅट सिव्हेर ब्रंटची आतापर्यंतची फलंदाजी आणि गोलंदाजीतील कामगिरी समाधानकारक झाली आहे. अॅमेलिया केरने काही सामन्यात बळी मिळविले. पण तिला अचूक गोलंदाजीसाठी झगडावे लागत आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 3 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली होती. त्यानंतर त्यांनी सलग 5 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली. 6 व्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सने नमविले. या पराभवानंतरही आरसीबीचा संघ गुणतक्त्यात 10 गुणासह पहिल्या स्थानावर असून त्यांनी सर्व प्रथम या स्पर्धेची प्ले ऑफ फेरी गाठली आहे.