Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात, पादचारी महिला जागीच ठार
तळगांव बाग स्टॉपजवळील घटना, राजापूर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल
राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळगांव बाग स्टॉपजवळ शुक्रवार 25 एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झालेल्या घटनेत पादचारी सरोज राज बहोरन रावत (45, मूळ रा. जनकपूर, मध्यप्रदेश, सध्या रा. वारगांव खारेपाटण, ता. कणकवली) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज बहोरन संपत्ती रावत (42) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या पत्नी सरोज रावत या महामार्गावरून चालत जात असताना मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. यात सरोज रावत यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 106 (1), 281, 125 (अ), 125 (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.