रखरखत्या उन्हाने रापली शेतकरी माउली!
कोंडसकोप माळावर शेतकऱ्यांचे भरउन्हात आंदोलन : इतरांना सुविधा; अन्नदात्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : उन्हातान्हात काम करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठीही भरउन्हात राहून आंदोलन करण्याची वेळ आली. रखरखत्या उन्हात जवळपास सावलीचा मागमूस नसणाऱ्या कोंडुसकोप येथील माळावर महिला शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले. एका महिलेला यासंदर्भात विचारले असता ‘आमच्या नशिबी उन्हातान्हात राबून आयुष्याचा लढा देणे जन्मापासूनचेच. परंतु, इथे तरी थोडी सावली मिळेल म्हणता इथेही उन्हातच लढा द्यावा लागत आहे’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्या शेतकरी भगिनीने दिली. अखिल कर्नाटक रयत संघाच्यावतीने वाढीव वीजदरासोबतच इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. कोंडुसकोप येथील माळावर आंदोलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, दुपारच्या रखरखत्या उन्हात महिलांना आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता. इतर कामगार तसेच संघटनांना सावलीत आंदोलन करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतच ही भूमिका का घ्यावी, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली. कोंडुसकोप येथील माळावर आंदोलकांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, या परिसरात सावलीसाठी एकही झाड उपलब्ध नाही की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जिल्हा प्रशासनाकडून मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, आंदोलनस्थळाला लागूनच मोबाईल टॉयलेट ठेवण्यात आल्याने महिलांची कुचंबणा होत होती. त्यामुळे मागण्यांसाठी आलेल्या शेतकरी महिलांना येथेही मूलभूत सोयींसाठी झगडावे लागले.
शेतकऱ्यांनाच सापत्नपणाची वागणूक का?
शेतकरी हा अन्न उत्पादन करून देशाला जगवत असतो. परंतु, याच शेतकऱ्याला हमीभाव, काटामारी, खतांच्या वाढीव किमती, कृषी विमा, दुष्काळाची नुकसानभरपाई यासाठी आंदोलन करावे लागते. जिल्हा प्रशासनाने इतर संघटनांना सुवर्णविधानसौध परिसरातील हलगा गावच्या शेजारी आंदोलनासाठी मंडप घालून दिले आहेत. परंतु, शेतकऱ्यांनाच कोंडुसकोप येथील माळावर आंदोलनासाठी जागा देण्यात आली. हलगा येथे तीन मंडप रिकामे असताना कोंडुसकोप येथे महिला शेतकऱ्यांना जागा का दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.