माता प्रेमात... मुले अनाथ...
पोलिसांसमोर निर्माण झाला पेच : नातेवाईकांनी काढला तोडगा
बेळगाव : समाजामध्ये काही घटना धक्कादायक घडत असल्याचे उघडकीस येत आहे. चक्क तीन मुले असलेल्या एका महिलेने 25 वर्षीय तरुणाशी विवाह केल्याची घटना उघडकीस आल्याने कॅम्प व गणेशपूर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आईच्या या प्रेमप्रकरणामुळे मुले अनाथ ठरल्याची घटना घडल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. आता नेमकी फिर्याद कशी नोंदवून घ्यायची, असा प्रश्न पोलिसांसमोर पडला. अखेर नातेवाईकांनी परस्परच हे प्रकरण मिटविले आहे. माता प्रेमात आणि मुले मात्र अनाथ झाल्याच्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.आपली आई बेपत्ता झाली आहे. तिचा शोध लावा, अशी फिर्याद 16 जून रोजी मुलाने कॅम्प पोलीस स्थानकात दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकरासोबत असलेल्या त्या महिलेला कॅम्प पोलीस स्थानकात बोलावून घेतले. त्याठिकाणी ती तीन मुलेही होती. आम्हाला आमची आई द्या, असे ती मुले सांगत होती तर आई आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी गुंतून गेली की पोटच्या मुलांना विसरून प्रियकरासोबतच राहणार असा हट्ट तिने धरला. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच गोची झाली.
सदर प्रेम करणारी महिला ही विधवा असून तिला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे तिला सरकारी वेतन आहे. मात्र, प्रियकरासोबत असल्यामुळे समस्या निर्माण झाली. पोलिसांना नेमके काय करायचे? असा प्रश्न पडला. तर मुलांचे मामा व इतर नातेवाईक तिला मुलांसोबत राहण्याची विनंती करत होते. मात्र ती इतकी प्रेमात गुंतली आहे की मी प्रियकरासोबतच राहणार असे सांगत नातेवाईकांनाही तिने झुटकारले आहे. या घटनेमुळे सारेच अवाक् झाले होते. शेवटी तिच्या नातेवाईकांनी आपल्या घरी नेऊनच त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेचे 75 टक्के वेतन हे मुलांना देण्याचा करार करण्यात आला. त्याला तिने मान्यता दिली. त्यामुळे अनाथ मुलेही मामाकडेच राहत आहेत. आई मात्र प्रियकरासोबतच राहणार आहे. एकूणच या घटनेमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.