भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मॉर्गन
आर्थिक वर्ष 2027 मध्ये जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज
वृत्तसेवा, नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्थाचा जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये जागतिक अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील सध्याचा तणाव असूनही, जागतिक वित्तीय संस्था मॉर्गन स्टॅनलेने भारताच्या आर्थिक विकासाबाबतचा आपला दृष्टिकोन अधिक दृढ केला आहे.
संस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 (आर्थिक वर्ष 27) साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये हा अंदाज 6.2 टक्के ठेवण्यात आला होता.संस्थेचा विश्वास आहे की कच्च्या तेलाच्या किमतीतील घट भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल. याच कारणामुळे, विकास दराचा अंदाज सुधारित करण्यात आला आहे.
कच्च्या तेलाच्या अंदाजात मोठी कपात
मॉर्गन स्टॅनलेने आपल्या ताज्या मूल्यांकनात कच्च्या तेलाच्या सरासरी किमतीचा अंदाजही कमी केला आहे. एप्रिल 2026 मध्ये, संस्थेने आर्थिक वर्ष 2027 दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 95 डॉलर राहील असा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी तेलाच्या उपलब्धतेबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
आता संस्थेने तेलाच्या सरासरी किमतीचा अंदाज प्रति बॅरल 87.5 डॉलरपर्यंत कमी केला आहे. अहवालानुसार, जागतिक तेलाच्या किमती जून 2026 च्या तिमाहीत उच्चांक गाठू शकतात, परंतु त्यानंतर त्या कमी होण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठा परिणाम जून 2026 च्या तिमाहीत अपेक्षित
मॉर्गन स्टॅनलेच्या भारतातील मुख्य अर्थतज्ञ उपासना चचरा यांनी, अर्थतज्ञ बानी गंभीर आणि श्रेया सिंग यांच्यासोबत लिहिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, ऊर्जा किमतींचा सर्वात मोठा परिणाम जून 2026 च्या तिमाहीत दिसून येऊ शकतो. दरम्यान, वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि पुरवठा साखळीशी संबंधित आव्हाने आर्थिक घडामोडींवर दबाव ठेवू शकतात.
बाह्य मागणीत चढ-उताराचे संकेत
भविष्यातील परिस्थितीबद्दल बोलताना, विश्लेषकांनी सांगितले की, बाह्य मागणीत चढ-उतार होऊ शकतात. हे मोठ्या प्रमाणावर सध्याच्या भू-राजकीय तणावाचा कालावधी आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील प्रगतीवर अवलंबून राहणार आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या मते, जर तणाव दीर्घकाळ टिकला, तर त्याचा पहिला परिणाम निर्यातीवर दिसू शकतो. जागतिक विकास आणि व्यापार मंदावल्याने, तसेच वाढत्या मालवाहतूक आणि विमा खर्चामुळे निर्यात कमकुवत होऊ शकते.
जागतिक अनिश्चितता हा मोठा धोका : मॉर्गन स्टॅनलेचे भाकीत
मॉर्गन स्टॅनलेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठ्या धोक्यांमध्ये जागतिक अनिश्चितता, मंद जागतिक आर्थिक वाढ, कडक आर्थिक परिस्थिती आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील कोणतीही नकारात्मक परिस्थिती यांचा समावेश आहे. हे सर्व घटक विकास आणि आर्थिक स्थिरता यांच्यातील संतुलनावर परिणाम करू शकतात.