For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनच्या लहरीपणामुळे चिंतेचे ढग

06:11 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनच्या लहरीपणामुळे चिंतेचे ढग
Advertisement

जून महिन्यातील प्रदीर्घ ओढ आणि आता जुलैच्या सुऊवातीला पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे कोकणातील शेती धोक्यात आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोकणचा मुख्य आर्थिक कणा असलेली भातशेती पूर्णपणे संकटात सापडली असून, बळीराजासमोर ‘शेती कशी करावी?’ असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय झाला, तर शेतीला नवसंजीवनी मिळू शकते अन्यथा यंदाचा हंगाम कोकणातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक कठीण ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement

दरवर्षी 7 जूनच्या सुमारास दाखल होणारा मान्सून यंदा जूनच्या अखेरपर्यंत गायब होता. त्यामुळे पेरण्या कमालीच्या लांबल्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुऊवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याने घाईघाईने लावणीच्या कामांना सुऊवात केली. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारली आहे. कडक ऊन पडत असल्याने तयार झालेली भात खाचरे सुकू लागली आहेत. शेतीची कामे खोळंबली असून भरडी लावणी रखडली असून पाण्याअभावी ठप्प झाली आहे.

कोकणात सखल-खाचरातील शेतीसोबतच डोंगराळ भागातील ‘भरडी’ जमिनीवर भात लावणी केली जाते. या जमिनींवर पाणी साठून राहत नसल्याने तिथे रोज पावसाची गरज असते. पाऊस थांबल्याने ही भरडी लावणी पूर्णपणे थांबली आहे. वेळेत लावणी न झाल्यामुळे रोपवाटिकांमधील भाताची रोपे आता पिवळी पडू लागली आहेत. ती जास्त मोठी झाल्यास लावणीयोग्य राहत नाहीत. जर पुढील काही दिवसांत पाऊस आला नाही, तर काही भागांत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी महागडी खते आणि बियाणांवर मोठा खर्च केला. मात्र, पावसामुळे कामे रखडल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती आहे. कोकणात लावणीसाठी परप्रांतीय आणि स्थानिक मजुरांची टोळी आधीच बुक करावी लागते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे मजुरांचे नियोजन कोलमडले असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँका आणि विकास सोसायट्यांकडून कर्ज काढून शेतीची कामे सुरू केली होती. आता पीक हातचे जाण्याच्या भीतीने त्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

कृषी विभागाच्या तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्राsत उपलब्ध आहेत, तिथे उपसा जलसिंचनाचा वापर करून रोपे वाचविण्याचा प्रयत्न करावा. तसेच, पाऊस सक्रिय होईपर्यंत लावणीची घाई करू नये. एकंदरीत, हिरवेगार दिसणारे कोकणचे सुजलाम् सुफलाम् चित्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे काळवंडले आहे. आता संपूर्ण कोकणच्या बळीराजाचे डोळे पुन्हा एकदा आकाशाकडे लागले आहेत.

जून महिन्यातील प्रदीर्घ ओढ आणि जुलैच्या सुऊवातीला दिलेल्या हुलकावणीमुळे दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती संकटात सापडली आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे केवळ चालू हंगामातील भातशेतीच धोक्यात आली नसून, दोन्ही जिल्ह्यांतील धरणांनी तळ गाठल्याने आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा इशारा जलतज्ञांनी दिला आहे.

लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण भागात जूनअखेर पडलेल्या पावसानंतर शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त होते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून कडक ऊन पडत असल्याने सखल भागातील खाचरे सुकू लागली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वैभववाडी तालुक्यांत ‘भरडी’ डोंगराळ जमिनीवरील भात लावणी पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत कोकणातील लहान-मोठे पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प ओसंडून वाहतात. मात्र, यंदा पावसाच्या मोठ्या खंडामुळे रत्नागिरीतील अर्जुना, नातूवाडी आणि सिंधुदुर्गातील तिलारी, देवघर यासारखी प्रमुख धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे भूजल पातळी वाढलेली नाही. विहिरी आणि कूपनलिकांच्या-बोअरवेल पाणीपातळीत आतापासूनच घट जाणवू लागली आहे.

जर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धरणांमध्ये अपेक्षित साठा झाला नाही, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई सुरू होईल. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांत संपूर्ण कोकणाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल आणि टँकर्सवर अवलंबून रहावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, मान्सूनचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. पूर्वी सलग पडणारा पाऊस आता कमी दिवसांत अतिवृष्टी व त्यानंतर दीर्घ खंड अशा स्वरुपात पडत आहे. यामुळे पारंपरिक भातशेतीचे नियोजन कठीण होत आहे. भविष्यात बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेतीपद्धती, जलसंधारण, शेततळी, सूक्ष्म सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाला अधिक महत्त्व द्यावे लागणार आहे.

आता संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागलेले आहेत. कोकणातील शेती ही केवळ व्यवसाय नसून येथील संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हा आधारच डळमळीत झाला आहे. एका बाजूला भातशेतीचे भविष्य धोक्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूला आगामी पाणीटंचाईचे संकटही डोके वर काढत आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाऊस सक्रिय होईपर्यंत लावणी न करण्याचा सल्ला दिला आहे. जलसंपदा विभागाने आतापासूनच उपलब्ध पाण्याचे नियोजन पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून कोकणच्या अर्थकारणाची आणि पाणीपुरवठ्याची मोठी परीक्षा घेणारा ठरणार आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.