फसवणूक झालेल्यांची रक्कम परत करणार
मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन :पूजा नाईकची सर्व मालमत्ता जप्त
पणजी : नोकरी घोटाळ्यातील काही तक्रारी कोर्टात असून तेथे निकाल झाल्यावर फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. पूजा नाईककडे असलेली सर्व रक्कम, मालमत्ता जप्त करण्यात आली असून तिला देखील गजाआड केले आहे. तिने गोळा केलेली रक्कम स्वत:साठीच खर्च केली असून ती रु. 17 कोटी असल्याचेही सावंत यांनी नमूद केले. आमदार विजय सरदेसाई यांनी नोकरी घोटाळ्dयाचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. सावंत हे उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी एकूण 51 तक्रारी आल्या असून त्यातील 32 तक्रारी कोर्टात आहेत.
उर्वरित तक्रारींची चौकशी सुरु आहे. जे या प्रकरणात गुंतलेले आहेत त्यांचे सरकारशी कोणतेच देणे-घेणे नाही आणि त्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे मागितले जातात. लोक देतात मग फसतात. लोकांनी नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये आणि हे प्रकार घडू नयेत म्हणूनच कर्मचारी भरती आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) स्थापना करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. सरदेसाई यांनी या प्रकरणात अनेक उलट-सुलट प्रश्न केले. पूजाने रु. 17 कोटी मंत्र्यांना दिले. त्या रकमेतून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? याची विचारणा त्यांनी केली. पूजा बॉस आहे तिचा आणखी कोण बॉस आहे? असे सवाल सरदेसाईंनी उपस्थित केले. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.