For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांची नाराजी

06:43 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांची नाराजी
Advertisement

नाराज आमदारांचा तक्रारींचा सूर : दुसऱ्या दिवशीही सुरजेवालांनी घेतल्या स्वतंत्र बैठका

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य काँग्रेसमधील आमदारांची नाराजी दूर करून सरकारच्या कार्यपद्धतीविषयी त्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला बेंगळुरात आले आहेत. त्यांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अनेक आमदारांशी स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा केली. अनेक आमदारांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे सुरजेवाला दिल्लीत गेल्यानंतर हायकमांडकडून कोणती भूमिका घेतली जाईल, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा  रंगली आहे.

Advertisement

आमदारांच्या तक्रारी व व्यथा जाणून घेण्यासाठी सुरजेवाला यांनी सोमवारी दिवसभर अनेक बैठका घेतल्या. उघडपणे वक्तव्ये केलेल्या आमदारांचे म्हणणेही जाणून घेतले. त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याचे आश्वाहनही दिले होते. मंगळवारीही अनेक आमदारांनी सुरजेवालांच्या भेटीवेळी मंत्री आमच्या समस्यांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांना ताकिद द्यावी. काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी मतदारसंघांच्या विकासासाठी निधी मिळत नाही. मंत्री आमच्या शब्दाला मान देत नाहीत. आमच्या पत्रांना उत्तर मिळत नाही. अधिकारीही आमचे ऐकत नाहीत, अशा तक्रारींचा सूर आमदारांनी ओढला आहे.

आमदारांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर सुरजेवाला यांनी सर्वकाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. हायकमांडलाही अहवाल देईन. उघडपणे काहीही वाच्यता करू नका, येत्या काही दिवसांत सर्वकाही ठीक होईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.

सुरजेवाला यांनी मंगळवारी बेंगळूरमधील आमदार एन. एन. हॅरिस, रिझवान अर्शद, एम. कृष्णप्पा, प्रियकृष्ण, शिवण्णा, ए. सी. श्रीनिवास, होसकोटेचे आमदार शरत बच्चेगौडा, मालूरचे आमदार के.वाय. नंजेगौडा, चिक्कमंगळूरचे आमदार तम्मय्या, तरिकेरेचे आमदार शिवशंकर, रामनगरचे इक्बाल हुसेन, मागडीचे आमदार एच. सी. बालकृष्ण, चन्नपट्टणचे आमदार सी. पी. योगेश्वर यांच्याशी चर्चा केली.

मला मंत्रिपदाची आशा नाही : राजू कागे

मला मंत्रिपद किंवा इतर कोणत्याही पदाची आशा नाही. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाशी संबंधित मुद्दे कोणत्याही भीतीशिवाय हायकमांडच्या निदर्शनास आणून देईन, असे कागवाडचे काँग्रेस आमदार राजू कागे यांनी म्हटले आहे.

राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची बेंगळुरात भेट घेण्याआधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मतदारसंघातील लोकांचे हित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी यापूर्वी केलेल्या वक्तव्यांशी कटिबद्ध आहे. शक्य तितके मुद्दे सुरजेवाला यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन.

सुरजेवाला यांच्या भेटीसाठी मला 30 जून रोजी दुपारी 2 ची वेळ देण्यात आली होती. मात्र, बेळगावमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने बैठकीत सहभागी झालो नाही. त्यामुळे मंगळवारचा दिवस मागितला होता. आमदार बी. आर. पाटील यांनी जे सांगितले ते सत्य आहे. काही मंत्र्यांचे वर्तन योग्य नाही. आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मतदारसंघाबाबत दिलेल्या पत्रांचा विचारच केला जात नाही. सार्वत्रिकपणे मंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडता येत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र वेळ देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

पक्षसंघटनेविषयी चर्चा : डी. के. शिवकुमार

राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला हे पक्षसंघटनेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि आमदारांची मते जाणून घेण्यासाठी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री बदल किंवा मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले. बैठकांविषयी कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे वर्ष पक्षसंघटनेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे येथील बैठका पक्षसंघटनेच्या संदर्भात आयोजित केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.