For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये! सरकारने जनतेची माफी मागावी- आ. सतेज पाटील

05:08 PM Aug 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये  सरकारने जनतेची माफी मागावी  आ  सतेज पाटील
MLA Satej Patil
Advertisement

महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत मालवण येथे भेट देऊन घेतली माहिती

मालवण मधील शिवछत्रपतीचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. उद्घाटनासाठी केलेल्या घाईमुळेचा ही घटना घडली असून महागळती सरकारचे हे अपयश आहे. हे अपयश शौर्याचा मोठा इतिहास असलेल्या नौदलाच्या माथी मारण्याचे पाप राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारने या घटनेबाबत जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानपरीषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. मालवण येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=FRgh91sBJ-A[/embedyt]

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमदार पाटील यांनी आज मालवण गाठले. याठिकाणी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, सोमवारी ही घटना घडल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. हा पुतळा उभारताना राज्य सरकारने योग्य खबरदारी घेतलेली नाही. केवळ उद्घाटनाची घाई असल्यामुळे, त्याचा मोठा इव्हेंट करायचा होता म्हणून अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा उभारणी वेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारचे हे वागणे अत्यंत दुर्दैवी आहे.

Advertisement

आपटेंची शिफारस कोणी केली?
भारतीय नौदलाच्या शौर्याचा मोठा इतिहास आहे. त्यांच्या कामाबाबत शंका घेणे, त्याच्यावर जबाबदारी ढकलणे म्हणजे नेव्हीचा आपमान आहे. पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील आपटे नावाच्या व्यक्तीला कोणी दिले? त्यासाठी कोणाची शिफारस होती? देशभरात अनेक दिगज कलाकारांनी मोठ्या वास्तू बनवल्या आहेत, त्यांना या कामासाठी का नेमले गेलं नाही? कोणत्याही शास्त्रात न बसणारे नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत का केले? पीडब्ल्यूडीचे पत्र आताचा व्हायरल कसे होते? असे सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

जनतेची माफी मागा
भारतीय नौदल गेल्या अनेक वर्षांपासून देशातील नागरिकांचे संरक्षण करण्याचे काम करत आहे. सरकारने आपले पाप लपवण्यासाठी नौदलाला बदनाम करू नये. या दुर्घटनेला सर्वस्वी महायुतीचे सरकार जबाबदार असून सरकारने जनतेची माफी मागावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा उभारू
मालवणमध्ये आहे त्याच ठिकाणी शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावा आणि तो पुतळा महाविकास आघाडीच्या काळातच उभारण्यात यावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल. या ठिकाणी आम्ही निश्चितच महाराजांचा भव्य पुतळा उभारू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, नगराध्यक्ष आफरीन करोल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, कार्याध्यक्ष विकास गावडे, प्रदेश प्रतिनिधी विकास भाई सावंत, साईनाथ चव्हाण, नागेश मोर्ये, प्रकाश जैतापकर, विजय प्रभू, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख नितीन वाळके, उपतालुकाप्रमुख उमेश मांजरेकर, मंदार ओरोससकर, राष्ट्रवादी उपतालुकाप्रमुख ऑगस्टीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, हेमंत माळकर, मधु लुडबे, आप्पा चव्हाण, संदेश कोयंडे, महेश अंधारी, अरविंद मोंडकर, लक्ष्मीकांत परुळेकर, पल्लवी तारे, उपसरपंच प्राची माणगावकर, किरण टेंभुलकर, केतनकुमार गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाऱ्याने झाडाची पानेही पडली नाहीत...पुतळा कसा कोसळले?- स्थानिकांचा उद्विग्न सवाल
या पाहणीनंतर आमदार पाटील यांनी स्थनिक लोकांच्या भावना जाणून घेतल्या. एका युवकाने भावनाविवश होऊन सांगितले कि, या घटनेशी वाऱ्याचा काहीही सबंध नाही, याठिकाणी झाडाची चार पाने पण पडलेली नाहीत. मग पुतळा कोसळतोच कसा असा उद्विग्न सवाल त्याने केला. तसेच पुतळ्याची दुरवस्था बघवत नाही, आम्ही त्यावर ताडपत्री टाकून तो झाकला आहे. याठिकाणी आपण स्थानिकांना विश्वासात घेऊन व सर्वांची मदत घेऊन लवकरच महाराजांचा पुतळा पुन्हा उभारावा अशी विनती या युवकाने आमदार पाटील यांना केली.

Advertisement
Tags :

.