Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी अन्....
शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून आमदार गायकवाड आक्रमक
कोल्हापुर - शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड हे आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे... आता त्यांनी 'शिवाजी कोण होता' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाड यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. "गोविंद पानसरे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत करणारा कोण? तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजांचा अपमान करतात," असे म्हणत गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. इतकेच नव्हे तर, "तुला माहिती आहे ना पानसरेंचे काय झाले? तुला घरात घुसून मारेन, तुझी जीभ छाटेन," अशी थेट धमकीही त्यांनी या संभाषणात दिली.
प्रकाशकाची ठाम भूमिका
या वादावर उत्तर देताना प्रकाशक प्रशांत आंबी यांनी स्पष्ट केले की, आमदार संजय गायकवाड यांचा मला 12 वाजून 51 मिनिटांनी फोन आला होता. नसरे यांचे 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकासंदर्भात ते माझ्याशी बोलले. आम्ही जवळजवळ नऊ मिनिटे फोन कॉलवर बोललो. त्यादरम्यान मी त्यांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा लेखकाचा कोणताही उद्देश नव्हता तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो. पण त्यांना पुस्तक वाचण्यात काही इंटरेस्ट दिसला नाही. तसेच हे पुस्तक १९८८ साली प्रकाशित झाले असून यात महाराजांचा कोणताही अपमान करण्याचा हेतू नाही. "तुम्ही आधी हे पुस्तक वाचा," असेही आवाहन त्यांनी आमदारांना केले. मात्र, गायकवाड यांनी त्यांचे काहीही न ऐकता शिवीगाळ सुरूच ठेवली. त्यावर आंबी यांनीही न डगमगता, "तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या," असे ठाम उत्तर दिले.
गायकवाडांचा वादांचा इतिहास
आमदार संजय गायकवाड यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली आहे. यापूर्वी ते आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता आज जागतिक पुस्तक दिनीच पानसरेंच्या शिवाजी कोण होते पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी देऊन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.