Kolhapur New: जलवाहिनी, रस्ते, कनेक्शन अर्धवट का? MLA महाडिकांचा ठेकेदाराला खडा सवाल
आत्तापर्यंत पन्नास टक्के काम तरी झाले का?
कोल्हापूर : गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्षे झाले. मात्र योजनेचे 50 टक्केच काम झाले. जिथे उकरले तिथे रस्ते केलेले नाहीत. पाण्याची कनेक्शन दिली नाहीत. सगळी कामे अर्धवट का करता, असे आमदार अमल महाडिक यांनी योजनेच्या ठेकेदाराला सुनावले. तसेच योजनांच्या कामाचे वेळापत्रक करा आणि त्या वेळेतच काम पूर्ण झाले पाहिजे, आशा सूचनाही त्यांनी केल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात महाडिक यांनी गांधीनगर नळपाणी पुरवठा योजनेचा आढावा बैठक घेतली. बैठकीला कार्यकारी अभियंता मनीष पवार, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाडिक म्हणाले, योजना 2022 मध्ये सुरू झाली. आत्तापर्यंत पन्नास टक्के काम तरी झाले का? 423 पैकी 209 किलोमीटरचे काम झाले.
कामाचा वेग वाढला पाहिजे. जलवाहिनीसाठी रस्ते उकरता पण पुन्हा रस्ते करत नाही. तुम्हाला रेस्टोरेशनसाठी 50 कोटी निधी आहे. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे कामही वेळेत पाहिजे. काही ठिकाणी नव्या वसाहती होत आहेत त्यांचाही विचार करा.
जागा बदलल्याने जिथे डिझाईन बदलणार आहे ते तत्काळ करा. कोणत्या परवानगी लागणार आहे ते सांगा त्या मिळवून देतो. योजनेचे वेळापत्रक बनवा. वेळेत काम पूर्ण झालेच पाहिजे, असे महाडिक यांनी अधिकारी व ठेकेदारांना सुनावले. तसेच पुढच्या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, आणि ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅ नेजर यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना करा.
योजनेच्या कामाचा रोज आढावा घ्या. दर पंधरा दिवसांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करायची, महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, वेळापत्रकानुसार त्या दिवशी तेवढे काम पूर्ण झाले पाहिजे, आवश्यक असणाऱ्या परवानगी आठ दिवसात मिळवा, अशा सूचनाही आमदार महाडिक यांनी केल्या.