Miraj News | मिरज पंचायत समितीचा भोंगळ कारभार! ५०० कुटुंबांच्या भवितव्याची फाईलच झाली 'गायब'; मालगावकर आक्रमक
मिरज पंचायत समितीच्या कारभारावर संताप
मिरज : तालुक्यातील मालगावयेथील शासनाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या सुमारे पाचशे कुटुंबांच्या नियमितीकरणाची फाईल पंचायत समितीमधून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गलथान कारभाराचा निषेध करत संतप्त कुटुंबीयांनी दलित विकास परिषदेचे अध्यक्ष योसेफ आवळे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
मालगाव येथील शासकीय जागेत राहणाऱ्या पाचशेहून अधिक कुटुंबांच्या जागेच्या नियमितीकरणासाठी तीन वर्षापूर्वी मिरज पंचायत समितीकडे फाईल सादर केली होती. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही फाईल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे वर्ग केली नाही. सध्या शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने, या कुटुंबांनी दलित विकासपरिषदेचे अध्यक्ष योसेफ आबळे यांनी पाठपुरावा सुरू केला होता.
गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी दहा दिवसांत ही फाईल तहसीलदारांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही फाईलचा पत्ता लागत नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. फाईलीच्या गोंधळामुळे तहसीलदारांनी नियमितीकरणासाठी बोलावलेल्या बैठकीबाबत पेच निर्माण झाल्याने आंदोलक अधिकचआक्रमक झाले.
अखेर उपसरपंच तुषार खांडेकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.दरम्यान, मालगाव येथीलसंबंधीत कुटुंबांच्या जागेच्या झालेल्या नियमीतीकरणाचे काम अंतिम टप्यात असताना पंचायत समितीमधून गायब झालेल्या फाईलीचा शोध घेवून वेळेत सादर न केल्यास आंदोलन करु असा इशारा योसेफ आबळे व मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिला.