For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्र्यांची ‘कला व संस्कृती’

06:02 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंत्र्यांची ‘कला व संस्कृती’
Advertisement

मंत्र्यांची ‘कला व संस्कृती’ काहीही असो. जयवंत दळवींचा गाजलेला ‘पुरुष’ मात्र नाहक अपमानीत झाला. अभिनेते शरद पोंक्षेच्या जागी नाना पाटेकर असते तर! असाही प्रश्न डोक्यात येऊन गेला. कला अकादमीत पुन्हा गोव्याची बेईज्जती होणार नाही, यासाठी मंत्री आता कोणता पुरुषार्थ दाखवितात, ते पाहावे लागेल. काहींना निवडणुकांचे डोहाळे आत्तापासूनच लागलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींसाठी मुख्यमंत्र्यांनी खूशखबर दिलेलीच आहे. बेकायदा घरांचे कायदेशीरकरण हे शिवधनुष्य मात्र सरकारला पेलणार, असे वाटत नाही. ‘झालीच पाहिजे’ हा मराठीचा गजर सरकारला जेरीस आणेल, यात शंका नाही. पुढील राजकारणाच्या कुणी कितीही गमजा मारल्या तरी उद्या कुणाचे, काय होईल, कुणी सांगावे, ही मंत्री रामकृष्ण ढवळीकरांची चिंताही खोटी नाही.

Advertisement

गोवा कला अकादमी ही गोव्याची शान आहे. गोव्याचे सांस्कृतिक वैभव या वास्तुत सामावलेले आहे. कलासक्त गोमंतकीय माणसांची भूक या सुंदर वास्तुने अनेक दशके भागविली. कला व संस्कृतीची अखंड सेवा केली. गोमंतकीयांना कला अकादमीचा गर्वच वाटत आला आहे. महाराष्ट्रानेही तिच्यावर भरभरून प्रेम केले. कधीकाळी तेच तर गोव्यातील एकमेव सांस्कृतिक केंद्र होते. अभिमान होता. आज तिच्या वाट्याला बदनामी येऊ लागलेली आहे, याची खंत कला आणि कला अकादमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयाला आहे. सत्तर कोटी रुपयांच्या नूतनीकरणानंतरही विस्कळीतपणा आणि तांत्रिक अडचणी! हे सारे आश्चर्यकारक आणि धक्कादायकच आहे. कला अकादमीचा घोळ की घोटाळा चहाट्यावर आल्याने मागच्या दोन वर्षांपासून गोमंतकीय कला क्षेत्रात तीव्र नाराजी आहे. या नाराजीचे पडसाद अनेकवेळा कला व संस्कृती खात्याचे मंत्री आणि त्यांच्या सरकारला दिसून आलेले आहेत. ‘कळतंय पण वळत नाही’, असेच काहीसे या मंत्र्यांचे आणि सरकारचेही झालेले आहे. कला अकादमी प्रकरणात पूर्ण दोष कला व संस्कृती खात्याचा नसला तरी मंत्र्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. कला अकादमीच्या नूतनीकरणाकडे मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध आहे. तरी मुख्यमंत्री तोंड उघडत नाहीत. त्यांनी सारे काही कला व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांकडे सोपविलेले दिसते परंतु या मंत्र्यांनी थोडे संयमाने घेतले असते किंवा कलाकारांच्या भावना जपल्या असत्या तर मंत्र्यांची ‘संस्कृती’ उघड्यावर पडली नसती. ठणठणीत असलेली कला अकादमीची प्रकृती नूतनीकरणाच्या नावाने केवीलवाणी बनविली गेली. मागच्या दोन वर्षांत कला अकादमी प्रश्नी राज्य सरकार आणि कला व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांची टर उडालेली आहे. सत्तर कोटींचे नक्की काय केले, असा प्रश्न विचारला जात आहे. जनतेचा पैसा कसाही मार्गी लावायचा मुक्त परवाना राज्यकर्त्यांना असल्याचे दिसते. अनेक प्रकल्पांवर कोटी कोटींची उ•ाणे होतात अन् ती वायाही जातात. हे रोखण्याची गरज आहे. जनतेचा पैसा वाया घालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा का नोंद होऊ नये, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. कला अकादमी हे जनतेच्या पैशांच्या गैरवापराचे एक उदाहरण आहे. त्यात खाणाऱ्यांनाच पूर्ण समाधान आणि जनतेला मात्र मनस्ताप.

गोव्याच्या जनतेला असा मनस्ताप सहन करण्याची आता सवयच झालेली आहे. ‘पुरुष’ नाट्याच्या प्रयोगाने तर त्यांचा काहीही दोष नसताना व्यावसायिक अभिनेत्यांना मनस्ताप दिला आणि प्रेक्षकांची माफीही त्यांनाच मागावी लागली. ऐन रंगात आलेला नाट्याप्रयोग तांत्रिक अडचणींमुळे बंद करावा लागला. रसिकांचा रसभंग झाला. ही घटना कला-संस्कृती मंत्र्यांना खुद्द कलाकार असूनसुद्धा क्षुल्लक वाटते, हे खरेतर आश्चर्यच आहे. कलेवर प्रेम करणारे रसिक खिशातील पैसा मोजून नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी, आपला किंमती वेळही खर्च करीत असतात, याचे भान मंत्र्यांनी ठेवले असते तर बरे झाले असते. राजकीय विरोधक कुठल्याही गोष्टींचे राजकारण करण्यासाठी टपलेले असतात, हे खरेच आहे. इथे मात्र संबंधित मंत्रीच हा विषय राजकारणात घुसवताना दिसतात. आपल्याविरुद्ध कारस्थान काय, सुपारी काय, गैर बोलतात, चुकीच्या लोकांच्या नादी लागलात वगैरे वगैरे, निर्लज्जपणे आणि तेही ताठ मानेने बोलणे, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे, जसे काही गोव्यातील जनता खुळीच आहे. आपल्या उथळ ‘संस्कृती’चे प्रदर्शन करण्यापेक्षा माफ करा, असे पुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घेऊ, असे म्हटले असते तरी थोडा आदर राहिला असता. पत्रकाराच्या तिखट प्रश्नांना सामोरे जाणे, हे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला फोनवरून शिव्या हासडण्याएवढे सोपे नाही, हे कला व संस्कृती मंत्र्यांना पक्के ठाऊक असावे. पत्रकारांच्या रोखठोख प्रश्नापासून सुटका करून घेणे, ही त्यांची कला समजूया. ‘संस्कृती’ अधूनमधून डोकावत असतेच. ती आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे. कला अकादमी प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पत्रकारांनाच नव्हे, जनतेलाही हवी आहेत. अकादमीची शोभा आता खूपच झाली. कुणा एका मंत्र्याचे नव्हे, गोव्याचे नाव बदनाम होत आहे. ‘पुरुष’ अपमानीत झालाच शिवाय आठ दिवसांनी आलेल्या ‘श्रीमंत दामोदर पंत’नाही कला अकादमीने घाम काढला. वातानुकूलित यंत्रणाच बिघडली. बिचारे भरत जाधव आणि त्यांची टीम, शांतच राहिली. गोव्याच्या ‘संस्कृती’ मंत्र्याचा त्यांनी धसका घेतला असावा. हे असे प्रकार कुठपर्यंत चालायचे. कला अकादमीचे जे नाट्यागृह पं. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने ओळखले जाते, त्या नाट्यागृहाचे हसे होणे गोव्याला परवडणारे नाही. मंगेशकरांच्या लौकिकाला बट्टा लागणार नाही, याची काळजी घ्या.

Advertisement

राहिला प्रश्न कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याचा. कला अकादमी प्रकरणात केवळ तेच संशयित नाहीत. जे काही व्हायचे, होऊन गेलेले आहे. चाड असेल तर ते राजीनामा देऊ शकतात अन्यथा तोंड बंद करून नको त्या ‘संस्कृती’चे प्रदर्शन करणे त्यांनी टाळावे, जबाबदारीचे भान ठेवावे, कला व संस्कृती खात्याची आणि कला अकादमीची प्रतिमा जपावी, हेच योग्य. राजकीय विरोधकांनी आवाज उठविणे, यात चुकीचे काहीच नाही. निवडणुकांना अद्याप साधारण दोन वर्षांचा काळ शिल्लक आहे. तरी काहींना आत्तापासूनच निवडणुकीचे डोहाळे लागलेले आहेत, हेही खरेच आहे. निवडणूकपूर्व युती ही भाजपची गरज आहे, मगोची नव्हे. मगो आपली सोय निवडणुकीनंतरही करू शकतो. राजकारणात काहीही घडू शकते, याची प्रचिती गोमंतकीयांना वेळोवेळी आलेली आहे. मंत्री सुदिन ढवळीकरांनी मात्र योग्यच उत्तर दिलेले आहे. पुढील राजकारणाच्या कुणी कितीही गमजा मारल्या तरी आज-काल जे काही घडतेय, ते पाहिल्यास उद्या कोण असेल, नसेल, काही सांगता येणार नाही. त्यामुळे मंत्री गोविंद गावडे यांनी अरेरावी थांबवावी आणि निश्चिंत राहावे, हेच योग्य.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.