माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे
तरुण वयात माणसाला पझेशन फार महत्त्वाचं वाटत असावं. मूल जसं मोठं व्हायला लागतं तसं त्याच्या हातात वस्तू दिल्या जातात आणि त्याला आपलं म्हणजे काय आणि दुसऱ्याचं म्हणजे काय हे शिकवलं जातं. उदाहरणार्थ हे खेळणं कोणाचं? की ते लहान मूल छातीवर हात मारत म्हणतं ‘माझ्यं माझ्यं!’ इथून त्या माझंच्या भ्रांतीच्या ओझ्याचा प्रवास सुरू होतो. तो कधी कधी अगदी अंथरुणाला खिळेपर्यंत सुरूच राहतो. माणसाचा अंत होतो. पण त्याचं माझं माझं काही संपत नाही.
या बाबतीत अतिशय गमतीदार अशी एक कथा कीर्तनात ऐकलेली आठवते. ती म्हणजे एक अतिशय श्रीमंत माणूस शेवटचा घटका मोजत अंथरुणावर पडलेला होता. सगळ्यांची मानसिक तयारी झालेली होती. त्याला नीट बोलताही येईनासं झालेलं होतं. आणि तो वा.... वा... के.... के.... असे उच्चार करत होता. कुटुंबातली इतर ज्येष्ठ मंडळी बिचारी वासुदेव केशव वासुदेव केशव असं देवाचं नाव घेतायत आजोबा असं म्हणून आपले डोळे पुसू लागली. परंतु त्यातल्याच एका चतुर नातेवाईकाला या माणसाच्या वा... वा... के... के.... चं गणित झटकन लक्षात आलं. ते म्हणजे वासुदेव केशव असं नसून ओसरीवर बांधलेलं वासरू केरसुणी खात होतं हे त्या माणसाला दाखवायचं होतं. म्हणजे अंतिम क्षण जवळ आला तरी घरातल्या वस्तूंचा मोह त्या माणसाला सुटत नव्हता. त्यामुळे जातानाही डोक्यात वासुदेव केशव घेऊन जाण्याऐवजी वासराने खाल्लेली ती केरसुणी घेऊनच तो माणूस परलोकी गेला असावा. माणसाचं माझं माझं करणं किती चिकट असतं याचं हे वरपांगी मजेशीर पण खरंतर अत्यंत गंभीर भासणारं हे उदाहरण!
वास्तविक त्या वासराने केरसुणी खाल्ली असती आणि त्याचं काही झालं असतं तरीही तो माणूस त्याला काहीच करू शकत नव्हता. केरसुणी फुकट गेली असती तरीही तो आणून देऊ शकणार नव्हता. लक्ष ठेवण्याचं काम तेही तो धड करण्याची शक्यताच नव्हती. कारण त्याचा शेवटचा प्रवास सुरू होता. मग ह्या भौतिक गोष्टींकडे इतकं लक्ष देऊन काय उपयोग? जाताना माणूस एकटा जातो हे अंतिम सत्य त्या माणसाला गेल्यानंतर तरी कळलं असेल की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे! आता ह्या भ्रांतीच्या ओझ्याला काय म्हणावं? पण माणसं का कोण जाणे सुधारत नाहीत. वेगवेगळ्या माध्यमात या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचं लेखन झालेलं आहे. अगदी अवघाची संसार सारख्या सिनेमातलं अतिशय गमतीशीर पार्श्वभूमीवरचं अतिशय गंभीर गाणं ‘राम भजन करले ना रे एक दिन जाना है भाई’ त्याची पार्श्वभूमी गमतीची आहे. परंतु ते गाणं जर का डोळे मिटून ऐकलं तर मात्र ते खरंच गंभीर आहे आणि माणसाने निर्मोही असावं हे ते गाणं सांगत राहतं हे जाणवतं. तसा काही काही माणसांचा एक विशिष्ट स्वभाव असतो ती बाहेरच्यांसाठी सळसूद असतात आणि घरात मात्र भूत! घरातल्या लोकांना ते सतत सांगत फिरतात मला तुमची गरज नाही. गावात माझी बांधलेली माणसं आहेत. माझ्यासाठी वाटेल ते करतील. माझ्यासाठी हवी तेव्हा येतील.
‘माझी माणसं’ ही एक अतिशय निरुपद्रवी वाटणारी पण इतके विविध आकार आणि रूप धारण करणारी संकल्पना आहे की त्याच्याबद्दल जितकं बोलाल तितकं थोडेच आहे. ‘आपली माणसं’ हा एक मुद्दा घेऊन सुंदर पैकी सिनेमा सुद्धा घडला. महत्त्वाच्या पुरस्कारांसाठी अगदी थोडक्यात हुकलेला पण एक अतिशय अप्रतिम कलाकृती असणारा चित्रपट म्हणजे आपली माणसं.
ज्यात घरातल्या आणि रक्ताच्या नात्याच्या माणसांचं उलट फिरणं हाच विषय मांडलेला आहे. वडील वारल्यानंतर त्यांच्या वाटणीची नोकरी मुलाला मिळते. त्यानंतर वडील जिवंत असल्याचं लक्षात येतं पण तो मुलगा त्यांना शेवटपर्यंत दडवून ठेवतो. का तर ती नोकरी जाईल म्हणून. यातल्या पात्रांचा राग सुद्धा येत नाही. स्वत:च्या मुलाच्या सुतकातही भसाभसा अन्नावर तुटून पडणारे वडील त्या पिक्चरमध्ये दाखवलेत. पहिल्यांदा आपल्याला राग येतो. नंतर त्यांची सुद्धा कीव येते. यात खऱ्या अर्थाने संवेदनशील पात्र एकच आहे. ते म्हणजे गेलेल्या माणसाची बायको. जिला नवरा परत आलेला आहे हे कळल्यानंतरही त्याला लपवून ठेवले जाते ही वेदना असह्य होत असते. माणसाचा माझं या संकल्पनेभोवतीचा हा प्रवास बघताना आपल्याला हेलावून सोडतो. जगण्यासाठी धडपड ही प्रत्येकाला करावी लागते. आपल्याला मिळालेली प्रत्येक वस्तू आणि त्या वस्तूवरचा आपला असलेला अधिकार टिकून ठेवणं हा जगण्यातला एक अपरिहार्य भाग असतो. परंतु वस्तू किंवा व्यक्ती नुसतीच घट्ट धरून ठेवण्याने आपली राहत नाही.
उदाहरणार्थ एखाद्या प्राण्याला आपण पाळतो म्हटल्यानंतर त्याचा गळा आवळेपर्यंत जर का त्याला पट्ट्याने बांधून ठेवलं किंवा दावं लावून ठेवलं तर तो प्राणी मरून जाईल. मग आपलं, माझं म्हणायला काही राहणारच नाही. माणसाला नेमकं हेच कळत नाही की आपल्या असणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती यांना नक्की कसं आणि किती प्रमाणात जवळ ठेवावं कारण जिवंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्राण्याला स्वातंत्र्य प्रिय असतं. आणि प्रेम किंवा हक्क या गोष्टीचं जर बंधन झालं तर मग माझं माणूस माझं राहतच नाही. ते निघून जाण्यासाठी मार्ग शोधायला लागतं. प्रेम म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच नसून मुक्त संचार हाच आहे.
जेव्हा मुक्त संचाराची मोकळीक असते त्या वेळेला प्रेमाचा खरा अर्थ कळतो. कारण ज्या व्यक्तीचं प्रेम आणि आपुलकी खरी असते ती व्यक्ती कितीही मोकळी सोडा आपल्याजवळून कुठेही जात नाही. ज्या व्यक्तीला आपण बांधून ठेवतो तिला नंतर खऱ्या अर्थाने आपल्याविषयी काहीच जवळीक उरत नाही. हे सत्य आहे. परंतु हे प्रगल्भपणे स्वीकारायला माणूस बऱ्याचदा कमी पडतो आणि अनेक नातेसंबंध तुटेपर्यंत ताणले जाण्याची आणि अयशस्वी होण्याची कारणं नेमकी हीच असतात.
काहीवेळा होतं काय, की असं करकचून आवळून ठेवल्या जाणाऱ्या बंधनात झिजून झिजून कित्येक माणसं मरून जातात. त्यांना ताब्यात ठेवणाऱ्या व्यक्तीला हेच वाटत असतं (विशेषत: या सगळ्या अशा प्रकारच्या घटनांना बायकांचेच जास्ती बळी पडत आलेले आहेत) त्यांच्या घरातल्यांना वाटत असतं की ही स्त्राr कुटुंबावर प्रेम करते. माझ्यावर प्रेम करते. परंतु त्यांना शेवटपर्यंत कधी कळत नाही हिला मी माझी माझी माझी माझी म्हणत राहिलो होतो ते एक भ्रांतीचे ओझं होतं. कारण माझ्या वागण्याला ती कंटाळलेली होती. नाइलाजाने, निरूपाय आहे म्हणून ती कशीबशी राहिली. व ज्या क्षणी तिला ते असह्य झालं त्या क्षणी ती मरून गेली. पण मनाने ती खरच कुटुंबात होती का? मनाने ती आपल्याला आपलं मानत होती का हे कित्येकदा मृत्यूनंतर डायऱ्या चाळून कळतं. मग माझं माझं म्हणणारी लोकं उध्वस्त होतात. त्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना तिला चार सुखाचे दिवस दाखवले असते तर चाललं नसतं का? पण हे समजण्यासाठी माणसाकडे जी प्रगल्भता, जी विचारशक्ती हवी असते तीच कुठेतरी कमी पडते.
आजीची ती म्हण आम्ही गमतीने घेतलेली असली तरी त्या म्हणीचा अर्थ मात्र खोलवर आहे याची शिकवण लहानपणापासूनच जर नीटपणाने देता आली तर माझं माझं चा अतिरेक होणार नाही. आयुष्य सुंदर होईल. प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला कळेल, काय वाटतं तुम्हाला?
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु