For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णा नदीत लाखो मासे मृत्युमुखी

10:41 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कृष्णा नदीत लाखो मासे मृत्युमुखी
Advertisement

कृष्णा-उपनद्यांतील पाणीपातळी खालावली : जलचरांचा नाश होत असल्याची खंत

Advertisement

बेळगाव : भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात दगावले आहेत. दुष्काळामुळे जलचरांचा नाश होत असल्याची खंतही व्यक्त होऊ लागली आहे. यंदा नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे. चिकोडी शहरानजीक कृष्णा नदीत लाखो मासे पाण्याअभावी मृत्युमुखी पडले आहेत. कृष्णा नदीने तळ गाठला आहे. दरम्यान, महाराष्ट्राने पाणी सोडावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, पाणी सोडण्यास उशीर झाल्याने काही ठिकाणी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्याबरोबर उपनद्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे नद्यांतील जलचरांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी वाळवंटासारखी कोरडी पडली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीलाही पाणी मिळेनासे होऊ लागले आहे. त्याबरोबर पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

मच्छीमार व्यवसायही अडचणीत

Advertisement

कृष्णा नदीशेजारी 800 हून अधिक कुटुंबांचा मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो. मात्र, यंदा नदीतील पाणी पूर्णपणे आटल्याने मच्छीमार व्यवसायही अडचणीत आले आहेत. याबाबत मच्छीमारांनी महाराष्ट्र शासनाकडे पाणी सोडण्याबाबत विनवणी केली आहे. मच्छीमार कुटुंबे दररोज हजारो क्विंटल मासळी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध भागात विक्री करतात. मात्र, नदीचे पाणीच आटल्याने हा व्यवसाय ठप्प झाला आहे. चिकोडी उपविभागात सात मच्छीमार सहकारी संस्था आहेत. या माध्यमातून अंकली, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, बेळगावसह मिरज, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मासळीची विक्री होते. विशेषत: हॉटेल, धाबे आणि रेस्टॉरंटना हे मासे पुरविले जातात. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने मासेमारी व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मासे, कासव, मगर, खेकडे, बेडूक आदी जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. विशेषत: लाखो मासे पाण्याविना तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थितीत जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेचा आणि संवर्धनाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.

पाणीसाठा समाधानकारक, मासे सुस्थितीत

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याने जलचरांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. मात्र, काही ठिकाणी जलाशयांमध्ये पाणीसाठा समाधानकारक आहे. त्या ठिकाणी मासे सुस्थितीत आहेत. पण पाणी कमी झाल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत.

- वसंत हेगडे (सहसंचालक मत्स्य खाते)

Advertisement
Tags :

.