मिचौंग’ची आंध्र सागरतटाला धडक
सुसाट वारा, मोठा पाऊस, इमारतींची हानी, बळींची संख्या 12 वर, साहाय्यता कार्याला प्रारंभ
► वृत्तसंस्था / बापटला
पाच दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचौंग’ या चक्रीवादळाने मंगळवारी आंध्रच्या सागरतटाला धडक दिली आहे. बापटला या शहरात यामुळे मोठी हानी झाली आहे. वादळामुळे अनेक वृक्ष कोसळले असून इमारतींनाही हानी पोहचली आहे. या वादळाच्या बळींची संख्या आता 12 वर पोहचली आहे.
साधारणत: दोन तास ही धडक सुरु होती. या वादळाचे केंद्र बापटला शहरापर्यंत आल्यानंतर त्याचा जोर ओसरु लागला. त्यानंतर दोन तासांनी ते जवळपास शांत झाले. या वादळामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात वृष्टी झाली असून अनेक शहरांमध्ये पाणी तुंबले आहे. तामिळनाडूत पावसामुळे पाच जणांचा बळी गेला. त्वरित आपदा निवारण कार्याला प्रारंभ करण्यात आला असून, केंद्र सरकारची साहाय्यता दलेही पोहचली आहेत.
हानी त्यामानाने कमी
2015 मध्ये आलेल्या अशाच वादळाने चेन्नई शहरात मोठा उत्पात माजविला होता. अनेक दिवस शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तसेच जीवित आणि वित्त हानीही मोठी झाली होती. यंदा त्यामानाने हानीचे प्रमाण कमी आहे. तामिळनाडू सरकार यावेळी आधीपासूनच दक्ष असल्याने हानी कमी झाली. या वादळाचा जोर 2015 पेक्षा जास्त असूनही हानी कमी झाली, असा दावा तामिळनाडूच्या द्रमुख खासदार कनिमोझी यांनी केला. या वादळामुळे चेन्नई शहरात 33 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आंध्रातही मोठा पाऊस होत आहे.
100 किलोमीटर वेगाने वारा
आंध्रच्या सागरतटाला हे वादळ धडकण्याच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटरहून अधिक होता. सागरतटाजवळच्या चार जिल्ह्यांना याचा फटका बसला. तटाजवळची कच्ची बांधकामे या वादळामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. तरीही तुलनेने हानी कमी असल्याचे प्रतिपादन प्रशासनाने केले आहे.
विमाने रद्द
आंध्रपदेशचा सागरतटीय भाग आणि तामिळनाडूत काही स्थानी नागरी विमानवाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. शाळांनाही एक आठवडा सुटी घोषित करण्यात आली. काही खेड्यांचा उर्वरित भागाशी संपर्क तुटला असून दूरध्वनी सेवाही बंद पडली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 51 नागरी विमान उ•ाणे रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आंध्रातील विशाखापट्टण, तिरुपती आणि विजयवाडा येथील विमानतळ ओस पडले आहेत. रेल्वेसेवाही कोलमडल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
घर कोसळून बालकाचा मृत्यू
आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात चिंडेपल्ली मंडल क्षेत्रात एक घर कोसळून चार वर्षांच्या एका बालकाचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे ओली झालेली भिंत त्याच्या अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दोन्ही राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन या वादळामुळे ठप्प झाल्याची माहिती देण्यात आली. तामिळनाडूत चेन्नई शहरातील अनेक भागांभध्ये लोकांनी घरे सोडून सुरक्षित स्थळी आसरा घेतला आहे. प्रशासन अशा लोकांना साहाय्य करीत आहे.
3 महिन्यांचा पाऊस 2 महिन्यांमध्ये
तामिळनाडूत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात 30 ते 40 सेंटीमीटर पाऊस पडतो. तेवढा पाऊस या वादळामुळे दोन दिवसांमध्येच पडल्याची माहिती त्या राज्याच्या हवामान विभागाने दिली आहे. काही स्थानी पूरपरिस्थिती गंभीर आहे. आंध्रातही अशीच स्थिती असून तेथेही पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.