For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहलगाम हल्ल्याचा संदेश

06:39 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
पहलगाम हल्ल्याचा संदेश
Advertisement

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला आहे. या साऱ्यांना ते केवळ हिंदू आहेत म्हणून ठार मारण्यात आले आहे, हे वास्तव समजून घेतले, तर हा केवळ एक हिंसाचार नसून हिंदू धर्माविरुद्ध युद्ध छेडण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणावे लागते. अनेक घातक उद्दिष्ट्यो साध्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, हे उघड आहे. बराच काळ काश्मीर खोऱ्यात शांतता नांदत आहे. विशेषत:, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यानंतर या भागावरची दहशतवादावरची काळी छाया हळूहळू ओसरु लागली आहे. काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसायाला बहर येऊ लागला आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांना शांततेचे महत्त्व अधिकच पटून ते दहशतवादाच्या मार्गापासून दूर होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली होती. काश्मीरमधील फुटीरतावादाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘हुरियत’ या संघटनेचे बळ दिवसेंदिवस कमी होऊ लागले होते. या संघटनेच्या सदस्य असणाऱ्या अनेक संघटनांनी गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये हिंसा आणि फुटीरतेचा मार्ग सोडून राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा निर्णय घेत हुरियतशी संबंध तोडले होते. नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये जी विधानसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षांमध्ये झाले नव्हते, तितके मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. विशेषत: मुस्लीमबहुल असणाऱ्या काश्मीर खोऱ्यात मतदानाची टक्केवारी दृष्ट लागण्यासारखी होती. कित्येक दशकांमध्ये प्रथमच या प्रदेशात एक खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार स्थानापन्न झाले आहे. या साऱ्या घडामोडी हेच दर्शवित होत्या की काश्मीरची गाडी अनेक दशकांनंतर पुन्हा रुळावर येत आहे. हे अर्थातच दहशतवाद्यांना पाहवणार नव्हते. काश्मीर खोऱ्यातील लोकांनी सतत दहशतवाद्यांच्या प्रभावाखालीच राहिले पाहिजे, अशी दहशतवादी संघटनांची इच्छा आहे. या इच्छेला या भागात घडणाऱ्या सकारात्मक घडामोडी छेद देत होत्या. त्यामुळे घड्याळाचे काटे पुन्हा मागे फिरविण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे, हे उघड आहे. पर्यटकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी काश्मीरला येणे थांबविले पाहिजे, हा या हल्ल्याचा दुसरा उद्देश आहे. तसे झाल्यास काश्मीर खोऱ्यातील स्थानिक तरुणांचा रोजगार बंद होईल, आणि त्यांच्यासमोर पुन्हा दहशतवादी बनण्याखेरीच दुसरा मार्ग राहणार नाही, अशी स्थिती निर्माण करणे, हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे आणि त्याची पूर्ती करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात केवळ अंदाधुंद गोळीबार करुन दहशतवादी पळून गेलेले नाहीत, तर त्यांनी अत्यंत थंड डोक्याने पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन, त्यांना कलमा पढण्यास सांगून ज्यांना कलमा पढता आला नाही, अशा हिंदू पुरुष पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली, असे प्रत्यक्ष पिडीत पर्यटकांनीच स्पष्ट केले आहे. याचा अर्थच हा धर्मयुद्ध छेडण्याचा प्रयत्न आहे असा होतो. केवळ काश्मीरमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतात अशांतता निर्माण करण्यासाठीचे हे कारस्थान आहे. या हल्ल्यासाठी जी वेळ निवडण्यात आली तीही वैशिष्ट्यापूर्ण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारतात आलेले असताना, तसेच केंद्र सरकारने केलेल्या नव्या वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी भारतातील अनेक मुस्लीम संघटनांनी प्रक्षोभक भाषा चालविलेली असताना आणि याच कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये दंगल उसळलेली असताना, हा हल्ला करण्यात आला. याचाच अर्थ असा की दहशतवादी संघटना भारतातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही स्थिती आणखी बिघडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होत आहेत. या सर्व प्रयत्नांना खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तानकडून केले जाते हे उघडे गुपित आहे. भारताने तसेच हिंदू समाजानेही या हल्ल्यापासून काही महत्त्वाचे धडे शिकणे आवश्यक आहे. भारत सरकारने काश्मीरमधील स्थिती आता पूर्णपणे सुधारलेली आहे, अशा समजुतीत राहणे योग्य नाही. विशेषत: ज्या स्थानी पर्यटकांची संख्या अधिक असते, तेथे सैनिकांच्या तुकड्या ठेवणे आणि सीमेवर अधिक कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवणे कर्तव्याचे आहे. दहशतवाद हा असा शत्रू आहे, की जो अचानकपणे कोठेही डोके वर काढू शकतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या समूहांसमवेत शस्त्रधारी सुरक्षा सैनिक असण्याची व्यवस्था करता आली, तर असे हल्ले रोखले जाऊ शकतात. विशेषत: दुर्गम भागांमध्ये तर अधिक चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावयास हवी. मात्र, काहीवेळा सुरक्षा व्यवस्था चोख असली तरीही असे हल्ले होतात. अशावेळी साऱ्या देशाने एकत्रितपणे, एका आवाजात अशा घटनांचा निषेध करावयास हवा. अशा घटनांचे राजकारण करण्याचा मोह प्रत्येक संबंधिताने टाळावयास हवा. कारण, दहशतवाद हे संकट केवळ एका राजकीय पक्षाशी संबंधित नाही. सर्वच राजकीय पक्षांना, त्यांच्या त्यांच्या सत्ताकाळात या संकटाशी दोन हात करावे लागले आहेत. हिंदू समाजासाठीही या हल्ल्यामुळे एक धोक्याची घंटा वाजविली आहे. उघडपणे धर्म विचारुन हा हल्ला करण्यात आला. यावरुन, दहशतवादाला धर्म नसतो, हा साळसूद प्रचार खोटा पडला. हिंदू हे धर्मांध दहशतवादाचे लक्ष्य असतील, हा संदेश या घटनेतून स्पष्टपणे देण्यात आला. तेव्हा यासंबंधीही विचार करण्याची आणि एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे सूत्र किती महत्त्वाचे आहे, हे यावरुन समजून येते. मात्र, एका बाबीची नोंद आवर्जून आणि कौतुकाने घ्यावयास हवी. या हल्ल्यानंतर पहलगाममधील स्थानिकांनी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढला. तसेच संपूण काश्मीर खोऱ्यामध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. असे गेल्या 40 वर्षांमध्ये प्रथमच घडले आहे. याचाच अर्थ असा की काश्मीर खोऱ्यातील स्थानिक मुस्लीम जनतेला आता दहशतवादाविषयी सहानुभूती वाटत नाही, हे स्पष्ट होते. हीच भावना अधिकाधिक वर्धिष्णू करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावयास हवे आहेत. या हल्ल्याला आता ज्या प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे ते सरकार आणि सुरक्षा दले यांच्याकडून दिले जाईलच. पण काश्मीर खोऱ्यात निराळे वातावरण निर्माण होत आहे, ही सकारात्मक बाबही समोर आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.