म. ए. समिती विधानसभा अधिवेशनात मुंबईत धडकणार
महाराष्ट्र एकीकरण समिती, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या बैठकीत निर्णय : महाराष्ट्रातून आंदोलनास सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही
कोल्हापूर : सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात भक्कपणे बाजू मांडावी, कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, अशा मागण्यांसंदर्भात मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात मुंबईत विधानभवनाला धडक देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या बैठकीत हा निर्णय झाला. महाराष्ट्र एकीकरण समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय समितीची बैठक शासकीय विश्रामधाम येथे उबाठा शिवसेनेचे विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर व प्रकाश मरगळे उपस्थित होते. यावेळी सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी,
कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, सीमाभागातील 865 गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी, यावर चर्चा झाली. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाबांधव व महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात रॅलीने जाऊन विधानभवनावर धडक देणार, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रातील सर्व जनता सीमाबांधवांच्या पाठीशी ठामपणाने उभी राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दिली. महाराष्ट्रातून या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करू, असेही सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला उद्योगपती व्ही. बी. पाटील, वसंत मुळीक, सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, बाबुराव कदम आदी उपस्थित होते.
समितीच्या नेत्यांकडून पालकमंत्र्यांची भेट
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किणेकर व प्रकाश मरगळे यांनी गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने ताकदीने सीमावासियांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती केली. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाभागातील मराठी बांधवांना महाराष्ट्र सर्वोत्तोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.