तुरमुरी, उचगाव भागात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव
कुत्र्यांच्या कळपाकडून सातत्याने माणसांवर-जनावरांवर हल्ले : जीव मुठीत घेऊन वावरण्याची वेळ
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी, उचगाव, सुळगा(हिं.), कल्लेहोळ या संपूर्ण परिसरामध्ये तुरमुरी कचरा डेपो आणि इतरत्र होणाऱ्या मांसाहारी जेवणांमुळे तसेच इतर यात्रांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आणि या भटक्या कुत्र्यांच्या कळपाकडून सातत्याने माणसांवर व जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे या परिसरातील जनतेला जीव मुठीत घेऊनच वावरण्याची वेळ आली आहे. यासाठी शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
बेनकनहळ्ळी भागामध्ये सुळगा(हिं.)या गावातील बकऱ्यांच्या शेतवडीत बसवलेल्या कळपावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून या धनगर समाजाचे मोठे नुकसान केले आहे. अशा अनेक घटना या भागांमध्ये सातत्याने घडत असल्याचे चित्र दिसून येते. तुरमुरी कचरा डेपोमध्ये बेळगाव शहरातून आणला जाणारा ओला, सुका कचरा यामध्ये अनेक खाण्याचे टाकाऊ पदार्थ असल्यामुळे या संपूर्ण भागात कुत्र्यांनी ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येते. कुत्र्यांच्या कळपाचा या कचरा डेपोच्या चोहोबाजूंनी असलेल्या झाडाझुडपांतून, आमराईतून सातत्याने वावर असतो. कचरा डेपोमध्ये शहरातून आणले जणारे शिल्लक टाकाऊ अन्नपदार्थ मिळत असल्याने या अन्नपदार्थावरती जगणारी ही कुत्री या ठिकाणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विद्यार्थी भीतीच्या छायेखाली
कोनेवाडी, बसुर्ते या गावातून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी चालत तुरमुरी, उचगाव येथील माध्यमिक शाळांमध्ये येतात. सकाळी आणि सायंकाळी सदर विद्यार्थी ये-जा करताना या कुत्र्यांची मोठी भीती लागून राहिली आहे. अनेकवेळा या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आमराईतून कुत्र्यांचे कळप झाडाखाली निवांत पडून असतात. या कुत्र्यांच्या कळपांपासून विद्यार्थ्यांवर अनेकवेळा हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबरोबरच सदर कुत्र्यांचे कळप सर्व गावातून फिरत असल्याचेही चित्र दिसून येते. मांसाहारी जेवणामुळे कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मांसाहारी जेवण आणि काही नागरिक मटन, चिकन दुकानातील शिल्लक पदार्थ सर्वत्र टाकले जातात. त्याच्यावरती सदर कुत्री ताव मारत असतात. परिणामी या भागात कुत्र्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. सदर कुत्री पहाटे, रात्रीच्या वेळी नागरिकांवर हल्ले करत आहेंत. यासाठी शासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.