बेनाडी येथील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिह्यातील बेनाडी गावातील प्रलंबित समस्या आणि अपुऱ्या सुविधांबाबत राज्य राज्य रयत संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत गावातील बिकट परिस्थिती मांडून मागण्यांचे निवेदन सादर केले. बेनाडीमध्ये रस्ते व गटारींची अवस्था अत्यंत खराब झाली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर अडथळे निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी गावात साचत असून यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी येथे रस्ते, गटारींसह विविध मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली.
आश्वासने नको कृती हवी
याशिवाय बेनाडीतील मातंग समाजाच्या वस्तीत गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गंभीर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती आहे. ग्रा. पं. व तालुका प्रशासनाकडून सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात.