महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या चिऱ्यांवर बंदीसाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर येथील वीट व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय
वार्ताहर /नंदगड
महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या खडकाच्या चिरा दगडावर बंदी घालावी यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्धार खानापूर तालुक्यातील वीट व्यावसायिकांनी घेतला. खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात वीट व्यावसायिकांची सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी गणपती पाटील (निडगल) होते. खानापूर व बेळगाव तालुक्यातील वीट व्यावसायिकांना आवाहन केल्याप्रमाणे सोमवारी दुपारी अनेक वीट व्यावसायिक खानापूर येथील विश्रामधामात आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग येथून चिऱ्याचे दगड खानापूर, बेळगाव, हल्याळ, जोयडा, धारवाड, बैलहोंगल आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळे स्थानिक विटांना मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम वीट विक्रीवर झाला आहे.
भविष्यकाळात असेच सुरू राहिले तर गेल्या 40 वर्षापासून वीट व्यवसायावर अवलंबून असलेले 15 हजारांहून अधिक लोक बेरोजगार बनतील. स्थानिकांचा रोजगार बुडाल्याने खानापूर व बेळगाव तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होईल. त्यासाठी आताच महाराष्ट्रातून येणाऱ्या चिऱ्यांवर बंदी घालण्याचा उठाव हाती घेण्यात आला आहे. सर्व वीट व्यावसायिकांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी, जिह्यातील मंत्री आमदार, खासदारांना निवेदन देण्याचे ठरले. यावेळी गोविंद जाधव, चांगाप्पा बाचोळकर, नामदेव गुरव, मोहन गुरव, यल्लाप्पा गुरव, परशराम कदम, दत्ता कदम, राजाराम गुरव, रमेश देसाई, गणपती मडवाळकर, शंकर निलजकर आदांसह अनेक वीट व्यावसायिक सहभागी झाले होते. सर्वांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला.