दुर्गानगर वसाहतीतील नागरिकांचे निवेदन
पाणी व्यवस्था, गटारी, रस्ते यासह विकासकामे करण्याची मागणी
खानापूर : शहरातील दुर्गानगर उपनगरातील गटारी, रस्ते, पाणी व्यवस्था यासह इतर विकासकामे राबविण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन दुर्गानगर वसाहतीतील नागरिकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना निवेदन देवून मागणी केली आहे. येत्या काही दिवसात विकासकामे राबविली नसल्यास याबाबत वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल,असे निवेदनात म्हटले आहे. दुर्गानगर उपनगरातील वसाहतीच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत 30 लाखाचा निधी गेल्या दोन वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. मात्र नगरपंचायतीने दुर्गानगर वसाहतीतील कोणतीही विकासकामे राबविलेली नाहीत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे तसेच आतील गल्लीतील गटारी, रस्ते, नळपाणी योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. गटारीचे नियोजन नसल्याने सांडपाण्याचा निचरा योग्यपद्धतीने होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणीही जाण्यासाठी गटारींची आवश्यकता आहे. मात्र नगरपंचायतीने दुर्गानगर वसाहतीत कोणतीच विकासकामे राबविलेली नाहीत. यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर निधीतील विकासकामे तातडीने राबवावीत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमृत पाटील, कृष्णा चोपडे, नामदेव पाटील, भगिरथ जळगेकर, रामचंद्र देसाई, संतोष मडीवाळर, दत्तात्रय गुरव, रावजी पाटील, विनायक वाघुर्डेकर, राजश्री गोधोळकर आदिंच्या सह्या आहेत.