वेताळ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मिनाक्षी गांवकर प्रथम
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सैनिक व पोलीस यांच्या पत्नी, मातांसाठी आयोजित “तो देशासाठी, मी घरासाठी – पण आम्ही दोघंही देशभक्त” या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ठाणे येथील मीनाक्षी गांवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक व पोलीस यांच्या पत्नी, मातांसाठी आयोजित “तो देशासाठी, मी घरासाठी – पण आम्ही दोघंही देशभक्त” या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.या स्पर्धेत राज्यभरातून २७ निबंध प्राप्त झाले, जेथून प्रत्येक निबंधामागे सैनिक व पोलिसांच्या पत्नी-मातांच्या संघर्षमय, पण प्रेरणादायी कथा उलगडल्या गेल्या. सर्व निबंधांचे परीक्षण डॉ. सचिन परुळकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, स्पर्धेत आलेल्या निबंधांमधून स्त्रियांच्या धैर्य, समर्पण, कर्तव्यपूर्ती आणि आत्मसन्मानाची झळक स्पष्ट दिसून आली.या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला. यात प्रथम मीनाक्षी चंद्रशेखर गावकर (ठाणे), द्वितीय अंजनी लवू सावंत (देवसू), तृतीय सुषमा सुरेश वालावलकर ( मळगाव), उत्तेजनार्थ प्रथम मनाली मनोज राऊत (सावंतवाडी), उत्तेजनार्थ द्वितीय प्रज्ञा प्रथमेश पालकर (वेंगुर्ला) यांनी क्रमांक पटकावला. वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, ही स्पर्धा केवळ निबंध लेखनापुरती मर्यादित नाही, तर सैनिक व पोलिसांच्या पत्न्या व मातांच्या अदृश्य बलिदानाला समाजासमोर आणणारी एक महत्त्वाची व्यासपीठ ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी आपल्या कहाण्यांद्वारे समाजाला संदेश दिला की, देशभक्ती ही फक्त सीमारेखेवर लढणाऱ्या सैनिकांची नाही, तर घर सांभाळणाऱ्या, जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आणि संघर्षाला सामोरे जाणाऱ्या स्त्रियांची ही आहे. विजेत्यांना प्रतिष्ठानच्या आगामी महोत्सवात गौरविण्यात येणार आहे.