संगीत सौभद्र’मध्ये अर्थपूर्ण गाणी-रोचक संवादांनी अर्थपूर्णता
वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची निर्मिती : आज ‘संगीत संशयकल्लोळ’
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी रंगभूमीला संगीत नाट्या परंपरेने मोठा वैभवशाली वारसा दिला आहे. याचेच प्रत्यंतर शनिवारी सायंकाळी कन्नड भवन येथे झालेल्या संगीत सौभद्र नाट्याप्रयोगा दरम्यान आले. अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित या नाटकामध्ये अर्थपूर्ण गाण्यांनी व तितक्याच रोचक संवादांनी अर्थपूर्णता आणली आहे.
बेळगावमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे मराठी रंगभूमी, पुणेची निर्मिती असलेला आणि गंधर्वभूषण, जयराम शिलेदार संगीत नाट्या सेवा ट्रस्ट प्रस्तुत हा प्रयोग झाला.
सुभद्रा आणि अर्जुन हे परस्परांवर अनुरक्त असूनही बलरामामुळे त्यांचा विवाह होण्याची शक्यता धूसर होते. मात्र, बहिणीच्या प्रेमाखातर आणि अर्जुनाच्या स्नेहाखातर कृष्ण एक धूर्त डाव रचून या दोघांना एकत्र आणतो व त्याची परिणती विवाहात होते, असे हे कथानक. संगीत सौभद्र असल्याने अर्थातच यामध्ये असंख्य गाणी आहेत आणि प्रत्येक कलाकाराने मोठ्या ताकदीने अभिनयासह गायनाचे आव्हान पेलले. चिन्मय जोगळेकर हे विशेष दाद घेऊन गेले.
या प्रयोगात निनाद जाधव, भक्ती पागे, सुदीप सबनीस, वैभवी जोगळेकर, सयाजी शेंडकर, अनुराधा म्हात्रे, अपर्णा पेंडसे, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, ज्ञानेश पेंढारकर यांचाही सहभाग होता. संगीत साथ संजय गोगटे व अभिजीत जायदे यांनी केली.
प्रारंभी आशा कोरे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून प्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. रंगभूमी ग्रुपच्या वर्षा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्ट्सचे डॉ. राजेंद्र भांडणकर यांनी नाट्याप्रयोगाचा हेतू स्पष्ट करून वर्षभर नाटकांचे आयोजन करण्याबाबतचा मनोदय व्यक्त केला.