दिपू दास हत्या प्रकरणी सूत्रधाराला अटक
वृत्तसंस्था/ढाका
बांगला देशमध्ये झालेल्या हिंदू युवकाच्या हत्येप्रकणी मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. 18 डिसेंबरला दास याची बांगला देशची राजधानी असणाऱ्या ढाका या शहराच्या नजीक निर्घृण हत्या करण्यात आली होती. तो एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याची हत्या धर्मांधांकडून करण्यात केली होती, अशी माहिती हत्या झाल्यानंतर देण्यात आली होती. 27 वर्षांच्या दास याला प्रथम त्याच्या कामापासून त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले होते.
त्यानंतर त्याला धर्मांध जमावाच्या हाती सोपविण्यात आले. या जमावाने त्यांची दगडांनी आणि हत्यारांनी ठेचण्यात आले होते. तो अधजीवित स्थितीत असताना त्याला झाडाला टांगून आग लावण्यात आली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद साऱ्या भारतभर उमटले होते. भारतातील बांगला देशच्या उच्चायोगाच्या कार्यालयावर हिंदू संघटनांनी निदर्शने केली होती. बांगला देशात साधारण एक वर्षापूर्वी सत्तांतर झाले होते. त्यानंतर तेथील हिंदूवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, गेल्या पाच आठवड्यांमध्ये 11 हत्या झाल्या आहेत. दिपू दास याच्या हत्येचा आरोप असणाऱ्यांचे नाव हुसेन अराफत आहे.
आरोपी शिक्षणाशी संबंधित
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी एका मशिदीत धार्मिक शिक्षण देण्याच्या कामावर होता. दिपू दास याच्यावर हल्ला करण्यास त्याने अन्य लोकांना उद्युक्त केले होते, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने ही हत्या करण्यासाठी केवळ जमावाला प्रोत्साहित केले असे नव्हे, तर त्याने व्यक्तीश: या हत्येत सहभाग घेतला होता. हत्या केल्यानंतर त्याने तेथून पलायन केले होते आणि तो गुप्त जागी लपून बसला होता. तथापि, त्याचा ठावठिकाणा समजल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.