लोक अदालतीमध्ये सतराहून अधिक दाम्पत्यांचे मनोमिलन
घटस्फोट-पोटगीला फाटा देत आणले एकत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायालय म्हटल्यानंतर केवळ वाद असे प्रत्येकाला वाटते. त्या ठिकाणी गेल्यानंतर विभक्त करण्यात येते. मात्र, न्यायालयाने गेल्या काही लोकअदालतींमध्ये नव्याने अनेकांचे संसार जोडले आहेत. यावेळीही 17 पेक्षा अधिक जणांचे मनोमिलन घडवून आणण्यात आले आहे. यामुळे गैरसमज असलेले दूर झाल्यानंतर कशाप्रकारे पुन्हा मनुष्य संसाराला लागू शकतो, हे या लोकअदालतीमधून दाखवून देण्यात आले आहे.
शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली. या लोकअदालतीमध्ये अनेकांनी घटस्फोट मिळावा आणि पोटगीची व्यवस्था व्हावी, अशी मागणी करण्याचे अर्ज दाखल केले. मात्र, जिल्हा न्यायाधीश त्यागराज तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांचे मनपरिवर्तन केले. जीवन हे एकदाच मिळते. त्या जीवनामध्ये प्रत्येकाने आनंद घेणे गरजेचे आहे. वाद हा प्रत्येक दाम्पत्यामध्ये होतो. मात्र, तो अधिक न ताणता तुम्ही संसार सुखाचा करा, असे मुख्य न्यायाधीश त्यागराज यांनी त्या दाम्पत्यांना सांगितले.
दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांना एकत्र आणणे गरजेचे
जिल्हा न्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे अनेकांचे मनपरिवर्तन झाले. बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयात अकरापेक्षा अधिक जणांचा संसार नव्याने जोडण्यात आला. तर तालुक्यातील इतर न्यायालयांमध्ये सहाहून अधिक जणांची मने जुळवण्याचे काम करण्यात आले आहे. यामुळे पोटगी किंवा घटस्फोटासाठी दावा दाखल करून दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांना एकत्र करण्याचे काम या लोकअदालतीमधून करण्यात आले आहे. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव मुरली मनोहर रेड्डी यांच्यासह पक्षकारांच्या वकिलांनीही यासाठी परिश्रम घेतले आहेत.