‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बाजार तेजीत
दिवसाच्या नीचांकी पातळीपासून 809 अंकांची वाढ
मुंबई :
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान देशांतर्गत शेअरबाजार बुधवारी तेजीसह बंद झाले. भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि त्यांच्या ताब्यातील पीओकेमधील दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर मोठी कारवाई केली. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, भारतीय सैन्याने पीओकेमधील 9 दहशतवादी संघटनांविरुद्ध मोठी कारवाई केली. यानंतर बुधवारी भारतीय भांडवली बाजारात मात्र उत्साहाचे वातावरण राहिले.
यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 105.71 अंकांनी वधारुन निर्देशांक वाढून 80,746.78 वर बंद झाला. त्याच वेळी, तो 79,937.48 च्या त्याच्या इंट्रा-डे नीचांकी पातळीपेक्षा 809.3 अंकांनी वर राहिला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळजवळ स्थिर स्थितीत उघडला. दरम्यान निर्देशांकात चढ-उतार दिसून आले. तो अखेर 34.80 अंकांनी वाढून 24,414.40 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील सर्वाधिक तेजीत राहणाऱ्या कंपन्यांमध्ये ऑटो कंपनी टाटा मोटर्स, वित्त क्षेत्रातील बजाज फायनान्स, इटरनल (पूर्वीचे झोमॅटो), अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. तो 5.05 टक्क्यांपर्यंत वाढत बंद झाला. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, सन फार्मा, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेक हे घसरणीत होते. ते 0.77 वरून 3.53 टक्क्यांपर्यंत घसरले.
जागतिक बाजारात काय?
बुधवारी जागतिक बाजार संमिश्र राहिले. एस अँड पी 500 आणि डाऊ जोन्स सुमारे 0.6 टक्के वर होते. अमेरिका आणि चीनने या आठवड्याच्या अखेरीस स्वित्झर्लंडमध्ये व्यापार चर्चा आयोजित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे सुरुवातीला आशियाई बाजारात तेजी आली.
अखेर, टोकियोचा निक्केई 225 निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरून 36,779.66 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक सत्राच्या शेवटी फक्त 0.1 टक्क्यांनी वाढून 22,691.88 वर बंद झाला. शांघाय कंपोझिट निर्देशांक 0.8 टक्के वाढून 3,342.67 वर बंद झाला.