पश्चिम भागात मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे
पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई : शेतकऱ्यांना चिंता, पिके करपू लागली : वळिवाची प्रतीक्षा
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायिनी ठरलेल्या मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडले. आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतवडीतील पिकांबरोबरच, या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आता तीव्र भासू लागणार असल्याचे संकेत या भागात निर्माण झाले आहेत. बेळगावच्या पश्चिम भागातून अनेक गावे आणि शेतवडीतून जाणारी मार्कंडेय नदी ही या भागाला लाभलेले एक वरदानच आहे. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये आता बटाटे, मका, ऊस, मिरची, सूर्यफूल आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला अशी अनेक पिके सध्या या नदीच्या पात्रातील पाण्यावर तग धरून होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा कमी कमी होत नदी आता पूर्णत: कोरडी पडल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे, याची चिंता लागून राहिली आहे. या नदीच्या पात्रातील पाण्यावर आतापर्यंत अनेक पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र आता शेतवडीत असलेल्या या पिकांचे पुढे काय करायचे, हा मोठा प्रŽ शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नदीच्या पात्रात पाण्याचा साठा एप्रिलपर्यंत टिकून राहिला तर मिरचीसह अनेक भाजीपाला पीक मोठ्याप्रमाणात या भागात शेतकरी घेत असतो. मात्र दरवषी मार्च महिन्यामध्ये या नदीचे पात्र कोरडे पडते. आणि शेतातील पिकांना पाणी नसल्याने पिके करपू लागतात. यासाठी मार्कंडेय नदीत पाण्याचा साठा मे अखेरपर्यंत टिकून राहणे अतिशय गरजेचे आहे. मार्कंडेय नदीपात्रात पाणी राहिले तर या भागातील प्रत्येक गावामधून असलेल्या सार्वजनिक विहिरीमधील पाण्याचा साठाही टिकून राहतो आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य राहात नाही. मात्र नदीच कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
मार्कंडेय नदीमध्ये तिलारीतील पाण्याची प्रतीक्षा
हीच परिस्थिती मार्कंडेय नदीची आहे. तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात आले तर या भागातही पाण्याची समस्या कधीच भेडसावणार नाही. तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून केला जातो. मार्कंडेय नदीच्या पात्रात पाण्याचा साठा भरपूर असेल तर बेळगाव शहरालाही पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही. यासाठी अनेकवेळा यासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. मात्र तिलारीच्या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यासाठी वेगवान हालचाली कोणाकडूनही होत नाहीत. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तरी शासनाने याचा तातडीने विचार करून मार्कंडेय नदीच्या पात्रातही पाणीसाठा कसा जास्त टिकून राहील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी, नागरिकांतून करण्यात येत आहे.
ताम्रपर्णी नदीला वर्षभर पाणी
बेळगाव तालुक्मयालगतच असलेल्या चंदगड तालुक्मयातील अनेक भागातून वाहत जाणारी ताम्रपर्णी नदीच्या पात्रात जंगमहट्टी धरणातील पाणी सोडले जाते. यामुळे नदीचे पात्र उन्हाळा, पावसाळा काठोकाठ भरून असते. परिणामी या भागात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या कधीच भासत नाही.