सुरळीत बससाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : बसअभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शाळा-महाविद्यालयांना वेळेत पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांचे हाल होत असून, अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यासाठी सोय करून देण्यात यावी, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.राज्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात सुरळीतपणे बस सोडल्या जात नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
राज्यात सरकारकडून शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बसची सोय करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बस समस्येला सामोरे जावे लागत आहे. यातच बसची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बस मिळणे कठीण झाले आहे. खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ओढा आता सरकारी बसकडे वाढला आहे. यामुळे विद्याथ्यर्नां याचा फटका बसत आहे. याबाबत परिवहन मंडळाकडे अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. सरकारने शक्ती योजना सुरू केली असली तरी याचा फटका विद्याथ्यर्नां बसत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळेत बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली.
बसअभावी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास विलंब होत असल्याने शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. बस मिळत नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गोरगरीब विद्याथ्यर्नां याचा फटका बसत आहे. शाळा-महाविद्यालयांच्या व विद्यापीठांच्या वेळेनुसार बस उपलब्ध करून देण्यात याव्यात. बसेसची संख्या वाढविण्यात यावी. ग्रामीण भागातील विद्याथ्यर्चीं होणारी गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेकडून सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व परिवहन मंडळाचे अधिकारी गणेश राठोड यांच्यामध्ये वादावादी झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला. दरम्यान, परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन यापुढे बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.