मनोज जरांगे पाटील यांची सभा यशस्वी करण्याचा निर्धार
पुन्हा एकदा मराठी भाषिकांनी एकजुटीतून ताकद दाखविण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहत आहेत. या मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी बेळगावमध्ये होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक जत्तीमठ येथे पार पडली. यावेळी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून सीमाभागातील मराठी जनतेने यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नाचा लढा असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सीमाभागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, याचबरोबर या भागातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघ-संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सभा यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी हाकदेखील देण्यात आली आहे.
बेळगावमध्ये पहिल्यांदाच जरांगे पाटील यांची सभा होत आहे. या सभेसाठी जागा येत्या दोन दिवसांमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच या सभेच्या तयारीला लागावे. जेणेकरून जरांगे पाटील यांना सीमाभागातील मराठी जनतेची एकजूट दाखवून द्यायची आहे. निवडणूक आणि या सभेचा कोणताही संबंध नाही. केवळ मराठी जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी, तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर ही सभा घेण्यात येणार आहे. तेव्हा यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण असणार नाही. तेव्हा समस्त जनतेने एकत्र येवून ही सभा यशस्वी करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सभेच्या नियोजनासाठी कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे. त्या सदस्यांमार्फत देणगी जमा करणे, तसेच इतर नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुस्कर, राजेंद्र मुतगेकर, अॅड. एम. जी. पाटील, मदन बामणे, रणजीत चव्हाण-पाटील, आर. एम. चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, अॅड. अमर येळ्ळूरकर, संतोष कृष्णाचे, आर. आय. पाटील, सागर पाटील, संजय मोरे, मारुती घाडी आदी उपस्थित होते.