तंत्रज्ञानाचा वापर करून स्वप्ने पूर्ण करा
डॉ. भीमराय मेत्री : आयएमईआरचा दुसरा दीक्षांत सोहळा
बेळगाव : देश विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत यामुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. नुकतेच सेमिकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात भारताने पाऊल टाकल्याने रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या व संशोधनाच्या आधारे आपली स्वप्ने पूर्ण करावीत, असे विचार नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. भीमराय मेत्री यांनी मांडले. कर्नाटक लॉ सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (आयएमईआर) चा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मेत्री बोलत होते. व्यासपीठावर केएलएसचे अध्यक्ष अॅड. अनंत मंडगी, सचिव अॅड. विवेक कुलकर्णी, चेअरमन अॅड. पी. एस. सावकार, सचिव एस. व्ही. गणाचारी, कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक, संचालक डॉ. आरिफ शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष अनंत मंडगी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत ह्युमन रिसर्च क्षेत्रात मोठी मागणी असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी. येथे घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग नोकरी करत असलेल्या संस्थेत करावा, यामुळे आयएमईआरचे नाव आपोआपच उज्ज्वल होईल. आयुष्य जगत असताना चांगले, वाईट प्रसंग येत राहतील. परंतु हार न मानता प्रत्येक क्षण आनंदाने घालवा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. प्रारंभी आर. एस. मुतालिक यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ. आरिफ शेख यांनी आयएमईआरच्या प्रगतीचा आढावा घेतला. सर्वाधिक उत्तम कामगिरी केलेल्या सौम्या आपसंगी हिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. सुरभी हत्तरगी हिने रौप्य तर गीता साहानी हिने कास्यपदक पटकाविले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.