रासायनिक खते सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्या
भारतीय कृषक समाजाची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे कारण पुढे करून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले आहेत. नित्योपयोगी वस्तूंचे दर वाढले आहेत. वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. रासायनिक खतांचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेती करणे प्रतीवर्षी खर्चीक ठरते आहे. मात्र उत्पादनांना योग्य दर मिळत नाही. केंद्र सरकारने रासायनिक खतांचे वाढविलेले दर कमी करून सवलतीच्या दरामध्ये वितरण करण्याची व्यवस्था करावा, शेतकऱ्यांची मागणी असलेली खते व कीटकनाशके वितरीत करण्यात यावीत, विक्रेते सांगतील तीच खते किंवा कीटकनाशके खरेदी करण्यास सक्ती करण्यात येऊ नये, रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजारात विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या भारतीय कृषक समाजाने केल्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
ग्रा. पं. तर्फे हस्तलिखित उतारे द्या
शेती व्यवसायासाठी लागणारे डिझेल सवलतीत उपलब्ध करून द्यावे, केंद्र सरकारने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या शिफारसीनुससार शेती उत्पादनांना किमान आधारभूत किंमत निश्चित करावी. पिण्याचे पाणी, बेरोजगारांसाठी उद्योग, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, राज्यातील काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, भूसुधारणा कायद्यातील दुरुस्ती मागे घेण्यात यावी, एपीएमसी शेतकऱ्यांसाठी हिताची ठरावी, कृषी उत्पादनाला भाव निश्चित करण्यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात यावी, शेतकऱ्यांना सातबारा उतारे महसूल खात्यामार्फत वितरीत न करता पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच वितरीत करण्यात यावेत, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ग्रामपंचायतींमार्फत हस्तलिखित उतारे देण्याची ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशा मागण्याही यावेळी केल्या.
मागण्यांची सात दिवसात पूर्तता न केल्यास आंदोलन
या मागण्यांची आगामी सात दिवसांत पूर्तता न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.