दिव्यांग लाभार्थ्यांना प्रशासनाची दिलासादायक घोषणा
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील सुमारे २२ दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही या योजनेपासून एखादा दिव्यांग लाभार्थी वंचित राहिला असेल, तर त्यालाही निश्चितपणे योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रतीची आवश्यकता नसून तहसीलदार कार्यालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले.
सावंतवाडी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल साई श्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटनेच्या वतीने तहसीलदार श्रीधर पाटील यांचा शाल, श्रीफळ व स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले, "दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. ज्या दिव्यांगांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. अंत्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी रेशनकार्ड काढून घ्यावे. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ दिला जाईल."
यावेळी पुरवठा विभागाचे निरीक्षक कमलेश ठाकूर यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष साबजी सांवत यांच्या हस्ते तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या कोलगाव शाखेचे घनश्याम मेस्त्री, रसिका घोगळे, देवयानी राऊळ, शिल्पा जाधव, सोनंद कोचरेकर, मानसी राणे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.