हल्दवानी हिंसाचारातील मुख्य सूत्रधाराला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हल्दवानी हिंसाचाराचा सूत्रधार अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. हल्दवानी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणात पोलीस यंत्रणा हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुल मलिकच्या मागावर होती. अब्दुल मलिक यांनी हल्दवानी येथील जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे.
8 फेब्रुवारी रोजी मदरशावर झालेल्या कारवाईनंतर बनभूलपुरा येथे हिंसाचार उसळला होता. त्या दिवशी स्थानिकांनी महापालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात आश्र्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर जमावाने पोलीस ठाणे पेटवून दिले होते. तसेच बानभुलपुरा हिंसाचारामुळे संचारबंदीही लागू करण्यात आली होती. बनभुळपुरा येथे ज्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली त्या जागेला ‘मलिक गार्डन’ असेही म्हणतात. त्यासोबतच दगडफेक आणि जाळपोळ झालेल्या घरांची कायदेशीर स्थिती काय आहे, याचीही चौकशी प्रशासन करत आहे.