एका श्वानासाठी ‘महासंग्राम’
कोणत्याही सार्वजनिक स्थानी काही घटना घडल्यास ती पाहण्यासाठी असंख्य लोक जमा होतात असा बहुतेकांचा अनुभव आहे. कित्येकदा आपणही असे करतोच. काही समस्या निर्माण असेल तर ती सोडविण्यासाठी प्रत्येकजण पुढे येतोच असे नाही. पण काय झाले याची माहिती घेण्याची उत्सुकता असते. या उत्सुकतेपोटी अनेकजण जमतात. मात्र असा जमाव सर्वसाधारणत: मोठी घटना घडली तरच जमतो असाही आपला अनुभव आहे. मात्र, बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील मानिकपूर या गावात कुत्र्यावरुन महासंग्रामाची घटना घडली आहे.
या गावात सन्नी भारती आणि अमरेंद्र गिरी असे दोन शेजारी आहेत. गेल्या शुक्रवारी अमरेंद्र गिरी यांचा कुत्रा सन्नी भारती यांच्या दारात गेला आणि तेथे त्याने नैसर्गिक विधी केला. त्यामुळे भारती यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी या कुत्र्याला पकडून बेदम मारहाण केली. कुत्र्याचे विव्हळणे ऐकून गिरी चौकशी करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. पाहता पाहता दोन्ही शेजाऱ्यांचे ‘समर्थक’ घटनास्थळी जमले. त्यांनी अक्षरश: लाठ्या-काठ्यांनी मारामारी केली. विटा आणि दगड यांची फेकही करण्यात आली. जणू एखादी धार्मिक किंवा जातीय दंगल व्हावी तसे वातावरण घटनास्थळी निर्माण झाले होते. बघ्यांचा जमाव तर हजारोंच्या संख्येने जमला होता. त्यामुळे पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणणे अतिशय अवघड गेले. या घटनेत अनेकजण जखमी झाले. काही जण तर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आता उपचार होत आहेत. दोन्ही गटांमधील अनेकजण तर दारु पिऊन तर्र होऊनच आले होते. त्यामुळे हा राडा अक्षरश: हाताबाहेर गेला. महत्प्रयासाने प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली होती. एका श्वानामुळे झालेला हा महासंग्राम आज या भागात चर्चेचा विषय बनला आहे.