पहिला दिवस दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी गाजवला
दिवसअखेरीस महाराष्ट्राचीही खराब सुरुवात,
प्रतिनिधी/ सोलापूर
सोलापुरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्यास सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र व सौराष्ट्र या दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवत दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाचे सहा बळी घेत सौराष्ट्रला 202 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा पहिला डाव देखील 7 बाद 116 धावांवर गडगडलेल्या अवस्थेत आहे.
नाणेफेक जिंकून सौराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सौराष्ट्र संघाचा हा निर्णय मात्र फारसा काही यशस्वी ठरला नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची अडखळत सुरुवात झाली. चौथ्या षटकातच हितेश वाळुंजने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर सौराष्ट्र संघाची 11 धावसंख्या असताना केविन जिवराजनी अवघ्या सहा धावांवर पायचीत होऊन तंबूत परतला. त्यापाठोपाठ विश्वराज जडेजा याला सुद्धा हितेश वाळुंज सहाव्या षटकात शून्य धावांवर परत पाठवले. त्यानंतर आलेल्या अनुभवी चेतेश्वर पुजारा 3 धावा काढून परतला. यानंतर दुसऱ्या सत्रात धमेंद्र जडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरताना सहाव्या विकेटसाठी 118 धावांची शतकी भागीदारी केली. पारेख मंकड याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याला खेळपट्टीवर फार काळ थांबता आले नाही. पारेख हा 56 धावांवर असताना तरनजितसिंग डील्लन याने त्यास पायचीत केले. धर्मेंद्र जडेजा एका बाजूने लढत असताना त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. 72 धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळुंज याने कौशल तांबे द्वारे झेलबाद केले. यानंतर तळाच्या फलंदाजांनही निराशा केल्यामुळे सौराष्ट्राचा डाव 60.1 षटकांत 202 धावांवर गारद झाला. महाराष्ट्राकडून हितेश वाळुंज याने सहा बळी तर तरणजीत डील्लन याने चार बळी घेतले.
महाराष्ट्राची खराब सुरुवात
महाराष्ट्र संघाची पहिल्या डावातील सुरुवात देखील निराशाजनक झाली. सहाव्या षटकात ओम भोसले अवघ्या 7 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कौशल तांबे व अंकित बावणे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. 20 व्या षटकात अंकित बावणे वैयक्तिक 34 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कौशल तांबे सुद्धा लगेच माघारी परतल्याने महाराष्ट्र संघ एकापाठोपाठ एक गडी गमावत गेला. केदार जाधव (3) तर, सिद्धार्थ म्हात्रे (11) यांनी धावा केल्या. सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजा याने चार बळी आणि युवराज सिंग दोडिया यांनी दोन बळी घेतले. दिवसाअखेर महाराष्ट्राने 29 षटकात 7 गडी गमावत 116 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राचा संघ अजून 86 धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र पहिला डाव सर्वबाद 202 (पारेख मंकड 56 धावा, धर्मेंद्र जडेजा 72 धावा. हितेश वाळुंज 6 बळी, तरणजीत सिंग 4 बळी).
महाराष्ट्र पहिला डाव - 116/7 (कौशल तांबे 37 धावा, अंकित बावणे 34 धावा, तरणजीत सिंग खेळत आहे 2, अजीम काझी खेळत आहे 4, धर्मेंद्र जडेजा 4, युवराजसिंग दोडिया 2 बळी)
रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पंच
या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पंच वीरेंद्र शर्मा (हिमाचल प्रदेश) तर रंजिव शर्मा (पंजाब) तर मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिष्किन (गोवा) हे काम पाहत आहेत. हा सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, व्हाईस चेरमन श्रीकांत मोरे, अकलूजवरून अनिल जाधव, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त भोसले आदी मान्यवर महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित